Onion Export Ban Lift Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export Ban Lift : केंद्र सरकारची कांदा निर्यातबंदी उठवण्याची फक्त घोषणा; अधिसूचना नाहीच!

Dhananjay Sanap

अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता.१८) मंत्री समितीची बैठक झाली. त्या बैठकीत कांदा निर्यातबंदी उठवण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सरकार कांदा निर्यात बंदी खुली करेल. सरकार त्याबद्दल सकारात्मक आहे, हे विधान आहे नाशिकच्या खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचं. कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचा दररोज आंदोलन, मोर्चा काढून सरकारचा निषेध करणं सुरूच होतं.

भारती पवारही सातत्यानं कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी करत होत्या. पण त्यांच्या मागणीची दखल केंद्र सरकार काही घेत नव्हतं. आता अखेर केंद्र सरकारला उशिरा का होईना पण कांद्यावरची निर्यातबंदी उठवण्याची घोषणा करण्याचं शहाणपण सुचलंय. पण अजून याबद्दल अधिकृत अधिसूचना काढण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदी उठवली की नाही, याबद्दल नेमकं काय समजायचं? असा प्रश्न आहे.

भारती पवार यांनी कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येईल, असंही सांगितलं आहे. पण सोमवारी (ता.१९) दुपारी ३ वाजेपर्यंत तरी निर्यातबंदी उठवण्याची अधिसूचना काढण्यात आली नव्हती. अधिसुचना काढली तरी त्यात पाचर मारली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिली पाचर असेल ती ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीची मर्यादेची. तर दुसरी पाचर निर्यात व्यापारी आणि निर्यातदार नाही तर नाफेड आणि एनसीसीएफच्या निर्यातीची. म्हणजे सरकारचं निर्यात करणार अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळं अधिकृत अधिसूचना काढली जात नाही तोवर या कांदा निर्यातबंदी उठवण्याबद्दल शेतकऱ्यांमध्येही संभ्रम आहे. कारण रविवारी (ता.१८) भारती पवार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची फक्त तोंडी माहित दिली होती. त्यामुळे निर्यातबंदी उठवण्याबद्दल अधिसूचना काढण्यात आली तरीही अटी शर्तीची मेख त्यात मारली जाण्याची शक्यता आहे.

वास्तविक केंद्र सरकारनं ८ डिसेंबर रोजी रातोरात कांदा निर्यातबंदी करून कांदा उत्पादकांना २ हजार कोटींचा चुना लावला. म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर कांद्याचे भाव वाढू नयेत, यासाठी पद्धतशीर बळी देण्यात आला तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा. त्यामुळं एक डाव तर केंद्र सरकारनं अचूक खेळला आणि त्यात बाजीही मारली. दुसरीकडे मात्र जागतिक पातळीवर या धोरण धरसोडीमुळं भारताच्या प्रतिमेला बेभरावशाचा कलंक लागला. आता तो पुसण्यासाठी कांदा निर्यातबंदी उठवण्याची घोषणा केल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळेच तर ५० हजार टन कांद्याची निर्यात बांगलादेशला करण्यात येणार आहे, अशीही चर्चा आहे.

वास्तविक कांदा निर्यातबंदीच्या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी मोर्चा, आंदोलन करत निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली. परंतु दोन महिने मात्र केंद्र सरकारनं चांगलीच शेतकऱ्यांची मातीच केली. आताही अधिसूचना काढून त्यात काही पाचर मारली तर शेतकऱ्यांना मात्र त्याचा किती फायदा होईल? हा खरा प्रश्न आहे. कांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे प्रमुख नाशिक कांदा बाजारात भाव वाढल्याच्याही बातम्या आल्या होत्या. पण कांद्याचे दर आजही स्थिर होते. कारण आवक वाढलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT