Kolhapur Flood  Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Flood : ...आम्हाला इथे माहेरच भेटले

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : ‘‘आम्हाला माहेरातही मिळत नाही इतकी चांगली वागणूक इथे मिळत आहे. पुरामध्ये आमची घरे संकटात असली तरी पाहुणचाराने अगदी इथे माहेर अनुभवतोय,’’ शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडीच्या श्री गुरुदत्त शुगर्स कारखान्याने सुरू केलेल्या पूरग्रस्तांच्या छावणीतील राजापूरच्या गीता गस्ते यांची ही बोलकी प्रतिक्रिया तिथले वातावरण स्पष्ट करते.

२००५ च्या महापूरापासून पूरग्रस्तांच्या छावणीचे सुरू असणारे व्रत आजही तेवढ्याच ताकदीने सुरू आहे. स्वतःच्या घरात पुराचे पाणी आलेले असतानाही गुरुदत्त कारखान्याच्या तात्पुरत्या निवाऱ्यात पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद अस्वस्थतेच्या वातावरणात ही समाधान फुलवतो. कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांची संवेदनशीलता हजारो पूरग्रस्तांना बळ देत आहे.

दरवर्षी पुराचा फटका सहन न होणारा. पाणी वाढत असल्याच्या बातम्या धस्स करतात. यंदाही तीच परिस्थिती. कुठे जायचे, काय खायचे हा प्रश्न. पण ही जबाबदारी घेतलीय ती शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडीच्या श्री गुरुदत्त शुगर्सने. कारखान्याचे अध्यक्ष श्री घाटगे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी परिस्थिती पाहून कारखाना परिसरात पूरग्रस्तांच्या निवाऱ्याची सोय केली.

तालुक्यातील बस्तवाड, अकिवाट, राजापूर, राजापुरवाडी, खिद्रापूर, जुने दानवाड, नवे दानवाड, कुरूंदवाड, चंदूर आदीसह शिरोळ तालुक्यातील पंधरा गावांतील सुमारे एक हजार पूरग्रस्त व सुमारे चारशे जनावरांना कारखान्याने हक्काचा आसरा दिला.

पुराचे पाणी जसे गावात आले तसे कारखान्याचा परिसर पूरग्रस्तांनी भरून गेला. शनिवारपासून(ता.२७) पूरग्रस्त येथे येण्यास सुरुवात झाली. जसे पाणी वाढेल तसे यात वाढच झाली.आठ दिवसांपासून अध्यक्ष श्री. घाटगे स्वतःच्या देखभालीखाली ही जबाबदारी पार पाडत आहेत. शासनाचा एक रुपयाही न घेता श्री. घाटगे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पूरग्रस्तांच्या सेवेचे व्रत जोपासले आहे. गुरुदत्त शुगर्समधील छावणीच ‘पूरग्रस्तांचं गाव’ बनली आहे.

चार नद्यांनी समृद्ध असणाऱ्या शिरोळ तालुक्यात महापुराची भीती वाढू लागल्यानंतर पूरग्रस्तांना गुरुदत्त शुगर्सची छावणी आपलीशी वाटू लागते. याठिकाणी आपले कुटुंब मुलाबाळांसह जनावरांची आभाळ होणार नाही याची खात्री त्यांना असते. पूरग्रस्तांना वेळच्या वेळी चहा, नाश्ता, जेवण, जनावरांना चारा, औषधोपचार स्वखर्चातून केला जातोय. स्नेहपूर्ण वातावरणाने माया माऊल्याही भारावून गेल्या आहेत. घर सोडल्याचे दुःख छावणीतील वातावरण पाहून हलके होत आहे. जातीपातीच्या, धर्माच्या, गावांच्या सगळ्या भिंती छावणीत गायब झाल्या आहेत.

पशुखाद्य आणि पशुवैद्यकीय सेवा

कारखान्यांच्या सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांची फौज पूरग्रस्तांच्या व्यवस्थेसाठी दिवस अन रात्र राबत आहे. पहिल्यांदा पूरग्रस्तांची सोय मगच घरचा रस्ता असाच दिनक्रम या कर्मचाऱ्यांचा आहे. कारखान्याच्या मालकीच्या तीस एकरांतील ऊस चाऱ्यासाठी तोडला जातोय. यासाठी कामगार परिश्रम घेत आहेत. केवळ चाराच न देता पशुखाद्य व पशुवैद्यकीय सेवा ही वेळच्यावेळी पुरवण्यात येत आहेत. मनुष्यांबरोबरच मुख्य जनावरांची हेळसांड टाळण्यासाठी होणारे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

शिरोळ तालुक्याला संकट बनून यापूर्वी आलेल्या महापूरात हजारो पूरग्रस्तांची सेवा केली आहे. आपत्तीच्या काळात गुरुदत्त शुगर्स नेहमीच माणुसकीच्या भावनेतून मदतीसाठी तत्पर राहिला आहे. गरीब पूरग्रस्तांचे होणारे समाधान आम्हाला या सेवेसाठी अधिक बळ देत आहे. यापुढेही अशीच सेवा कायम राहील.
- माधवराव घाटगे, अध्यक्ष, श्री गुरुदत्त शुगर्स

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Power : पश्चिम विदर्भातील ६ हजार घरांवर सौर ऊर्जानिर्मिती

Suryaghar Yojana : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ३६५३ जणांना सूर्यघर योजनेचा लाभ

Majhi Ladki Bahin Yojana : तुम्ही ताकद द्या, ‘लाडकी बहीण’चा निधी वाढवू

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT