शेतकरी ः विनोद राजाराम यादव
गाव ः सांगरूळ, ता. करवीर, जि. कोल्हापूर
ऊस क्षेत्र ः ६ एकर
खोडवा ः दोन एकर
कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरूळ (ता. करवीर) येथील विनोद यादव यांची पूर पट्ट्यात शेती आहे. प्रत्येक वर्षी शेतीचे पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान होते. त्यामुळे त्यांनी लागण, खोडव्याबरोबर पावसाळ्यानंतर अन्य पिके घेण्यावर भर दिला आहे. एका पट्ट्यात खोडवा तुटला की भात, भुईमूग, सूर्यफूल, कलिंगड, काकडी इत्यादी पिकांची लागवड केली जाते.
विनोद यादव यांनी २०११ पर्यंत अभियंता म्हणून आयटी क्षेत्रात काम केले. मात्र त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. शेती करायला देऊन परवडत नसल्याने त्यांनी घरची शेती कसण्यास प्राधान्य दिले.
कांडी लावण सोडून रोपांची लावण सुरू केली. को ८६०३२ या ऊस वाणाची निवड करतात. लागणीचे उत्पादन एकरी ८० टनांपर्यंत येते. शेतीत पूर्णवेळ लक्षकेंद्रित करत विविध प्रयोग करण्यावर भर दिला.
अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून शेतीतील प्रयोगशीलता जपली. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांशी चर्चा करीत नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली.
जिवाणू खतांचा प्रभावी वापर
२०१४ मध्ये त्यांनी लावण उसाची तोड झाल्यानंतर पाला ठेवत खोडवा राखला. खोडवा येईल की नाही, याबाबत अन्य शेतकऱ्यांनी साशंकता व्यक्त केली. पण विनोद यादव यांनी खोडवा राखण्याचा निर्णय घेतला. यासाठी जिवाणू खतांचा आधार घेतला.
विद्यापीठामध्ये मिळणारे मेटाऱ्हायझिम जिवाणू खतांचा वापर पाटपाणी पद्धतीने केला. त्यानंतर खत पद्धतीतही बदल केले. या माध्यमातून एकरी ४० टनांपर्यंत खोडवा उत्पादन मिळाले. हुमणीचा प्रादुर्भाव देखील दिसून आला नाही. जिवाणू खतांचा प्रभावी वापर केल्यामुळे उत्पादन चांगले मिळाले असल्याचे विनोद यादव सांगतात.
अन्नद्रव्ये व्यवस्थापन
खोडवा व्यवस्थापनासाठी व्ही.एस.आय. निर्मित निविष्ठांच्या वापरावर भर देण्यात येतो. जानेवारीला लागण तुटून गेल्यानंतर भोंड्यावरून ट्रॅक्टर फिरविला जातो. त्यामुळे खोडवे तळाबरोबर बसतात. त्यावर ट्रायकोडर्माची फवारणी केली जाते. दोन फणी ट्रॅक्टरच्या साह्याने दोन्ही बाजूंनी बगला फोडून घेतल्या जातात. यामुळे ठेवलेले पाचट मातीआड होण्यास मदत होते.
खोडवा तुटल्यानंतर १५ दिवसांनी रासायनिक खतांच्या मात्रा तीन टप्प्यांत दिल्या जातात. १०ः२६ः २६, युरिया, झिंक, फेरस, मॅग्नेशिअम सल्फेट या प्रमाणे खतमात्रा देण्यात येतात. खतमात्रा दिल्यानंतर पाटपाणी दिले जाते.
उगवण सुरू झाल्यानंतर पाल्यावर शिफारशीत जिवाणू खताची फवारणी केली जाते. जेणेकरून फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत मिळेल. त्यानंतर रासायनिक बुरशीनाशकांची आळवणी केली जाते. खोडवे उगवणीनंतर साधारण पंधरा दिवसांनी हे व्यवस्थापन केले जाते.
भरणीवेळी पाला कुजविण्याचे प्रयत्न
दीड महिन्यानंतर भरणी करताना शेणखत, कोंबडीखत, लेंडीखत यांचे मिश्रण करून वापर केला जातो. सोबत जिवामृत, जिवाणू खतांचे मिश्रण पाल्यावर टाकले जाते. यामुळे पाला जमिनीत चांगला गाडला जाऊन कुजतो. त्यामुळे पिकास आवश्यक पोषकद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत मिळते. त्यानंतर पुन्हा रासायनिक खतांच्या मात्रा, जिवाणू खते दिली जातात. ऊस सहा महिन्यांचा झाल्यानंतर व्ही.एस.आय. निर्मित उत्पादनांची फवारणी दिली जाते.
सध्या खोडव्याची पूर्ण वाढ
सध्या दोन एकर क्षेत्रावर खोडवा आहे. वाढ चांगली असून २७ ते २८ कांड्यावर ऊस आहे. कांड्याची वाढ चांगली असल्याने यंदाही उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. सध्या ऊस तोडणी सुरू झाली आहे. एकरी साठ टनांपर्यंत खोडव्याचे उत्पादन मिळेल असे अपेक्षित असल्याचे विनोद यादव सांगतात.
- विनोद यादव ८९९९०८३६८३
(शब्दांकन ः राजकुमार चौगुले)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.