Nashik News : केंद्र सरकारने भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत जवळपास ५ लाख टन कांद्याची खरेदी केली. मात्र खरेदीत गैरव्यवहार असल्याने शेतकऱ्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या त्याची दखल घेऊन ‘नाफेड’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी (ता. १०) नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी शेतकरी नेत्यांनी पथकातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. मात्र म्हणणे लक्षात घेऊन नोंद घेण्याऐवजी अधिकाऱ्यांनी गंभीर तक्रारींकडे कानाडोळा केला. या माध्यमातून ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांना गैरव्यवहारातून वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.
कातरणी (ता. येवला) येथील शेतकरी गोरख संत यांनी कांदा खरेदी गैरव्यवहाराची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार ‘नाफेड’च्या अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक ए. के. रथ यांनी पत्र देत सुनावणी घेण्याचे ‘नाफेड’ पश्चिम विभागीय व्यवस्थापक वीणा कुमारी यांना आदेश केले होते. त्यानुसार वीणा कुमारी, बंगळुरू कार्यालयाचे विनय कुमार, मुंबई कार्यालयाचे नितीन साखरे यांच्या उपस्थितीत ही सुनावणी झाली.
दरम्यान येथे शेतकरी संघर्ष सभेच्या शिष्टमंडळाने निवेदन देत पुन्हा अनेक आरोपांची यादीच पथकाकडे दिली. शेतकरी नेत्यांनी दिलेल्या निवेदनात खरेदी व साठवणूक यासंबंधी कांद्याचे ऑडिट केल्याशिवाय हा कांदा बाहेर काढू नये, अशी मागणी करण्यात आली. घाईघाईत पुरवठा सुरू करून कांदा खरेदीतील गैरव्यवहार दडपण्यासाठी काम होत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
‘नाफेड’चे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी भ्रष्टाचाराची पोलखोल माध्यमांसमोर केली. त्यांनतर केंद्राचे पथक आले. मात्र त्याचा अहवाल समोर आणला का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. तफावत असल्याने आपण साठा तपासावा अशी मागणी केली. त्यावर ‘‘आम्ही याबाबत खात्री केली आहे आता त्याची गरज काय?’’ असे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितल्याने हे प्रकरण दडपवले जात असल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे.
अधिकाऱ्यांनी माहिती देण्याचे टाळले
‘नाफेड’च्या कार्यालयात मंगळवारी (ता. १०) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कांदा खरेदीसंदर्भात झाडाझडती घेतली. मात्र ही चौकशी नव्हतीच असे ‘नाफेड’चे पदाधिकारी व अधिकारी सांगत आहेत. मात्र ‘नाफेड’च्या अतिरिक्त कार्यकारी संचालकांनी विना कुमारी यांना चौकशी व सुनावणीचे थेट आदेश दिले होते. या बाबतचे पत्रही ‘ॲग्रोवन’च्या हाती लागले आहे. या बाबत थेट विना कुमारी यांना ‘ॲग्रोवन’ने संपर्क साधला असता या दौऱ्याची पार्श्वभूमी काय? नेमकी कोणती चौकशी केली? असे विचारले असता ‘‘या बाबत मी अधिक बोलू शकत नाही. नियमांचे उल्लंघन करणार नाही,’’ असे म्हणत अधिक बोलणे टाळले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.