ना. धों. महानोर आणि इंद्रजित भालेराव Agrowon
ॲग्रो विशेष

Indrajit Bhalerao : ना. धों. महानोर : एक विरोधाभक्ती

Agrowon Diwali Ank : मी लोकांना कवी म्हणून माहीत होण्याच्या आधी महानोरांचा शत्रू म्हणूनच माहीत झालो. तेव्हापासून माझ्यावर तो शिक्का कायमचा बसला. पण त्याच वेळी मी महानोरांवर देखील किती प्रेम करत होतो हे सांगण्याची जागा आणि संधी मला कोणी उपलब्ध करून दिली नाही.

Team Agrowon

इंद्रजित भालेराव

१९८०-८२ चा काळ. आमची पिढी नेमकीच वाचायला, लिहायला लागलेली होती. आणि नेमका त्याच काळात ना. धों. महानोर यांच्या कवितेचा डंका वाजत होता. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते लता मंगेशकरांपर्यंत सगळे जण एकसुरात महानोरांच्या कवितेच्या कौतुकाच्या नौबती झडवत होते. ते सगळं कानावर येत होतं. महानोरांचा ‘रानातल्या कविता’ हा कवितासंग्रह मिळवून, रानामध्येच वाचून आम्हीही त्या कवितेने बेभान झालेलो होतो. महानोरांच्या कवितेला रानाचा लळा होता आणि महानोरांच्या कवितेने अख्ख्या महाराष्ट्राला लळा लावला होता.

या शेताने लळा लाविला असा असा की

सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो

आता तर हा जीवच अवघा असा जखडला

मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो

ही या कविता संग्रहातली महानोरांच्या हस्ताक्षरातली पहिलीच कविता सर्वांना जखडून टाकणारी होती. रानावनातल्या माणसांनाही ती आपली वाटत होती आणि शहरी मध्यमवर्गीयांनाही ती रम्य वाटत होती. त्यामुळे महानोरांच्या कवितेचा रसिक चाहता हा रानाडोंगरापासून ते महानगरांपर्यंत पसरलेला होता. त्या काळात महानोरांच्या वाट्याला जे कौतुक आलं ते इतर कुणाही कवीच्या वाट्याला आलं नाही.

१९७८ मध्ये आलेला ‘जैत रे जैत’ चित्रपट आणि त्यातली गाणी सगळ्या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून वाजत होती, गाजत होती. ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली, ढोल कुणाचा वाजे जी’ या गाण्यासोबत सर्वत्र महानोरांच्याच कवितेचे ढोल वाजत होते. एकापाठोपाठ एक अशा अनेक विक्रमांनी महानोर यांची कविता पुढे पुढे चालली होती. त्या देदीप्यमान यशाकडे आमची पिढी विस्फारीत डोळ्यांनी पाहत होती. त्यापासून प्रेरणा घेत होती. रानातल्या कवितानंतर एकापाठोपाठ एक त्यांचे वही, पावसाळी कविता, पळसखेडची गाणी, प्रार्थना दयाघना, पानझड, तिची कहाणी असे कवितासंग्रह येत गेले. आम्ही उत्सुकतेने वाट पाहत भारावून वाचत गेलो.

ना. धों. महानोर या नावाचा पहिला परिचय झाला तो रेडिओमधून. ‘जैत रे जैत’ चित्रपटाची गाणी आली आणि माझ्यासारख्या आडनिड्या वयाच्या मुलांना त्या गाण्यांनी झपाटून टाकलं. तो १९७८ चा काळ. रेडिओवर सर्व आकाशवाणींच्या ‘आपली आवड’ या श्रोत्यांनी पसंती कळवलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमात पहिलं गाणं ‘जैत रे जैत’मधलंच असायचं. मग ते कधी ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली’ असे, तर कधी ‘मी रात टाकली, मी कात टाकली’ हे गाणं असे. ‘आपली आवड’मध्ये प्रामुख्याने ही दोनच गाणी जास्त गाजत होती.

रेडिओ कानाला लावून आम्ही ‘आपली आवड’ची वाट पाहायचो. त्या काळी मुंबई, जळगाव, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद अशा पाच आकाशवाणी केंद्रांवर रविवारी हा कार्यक्रम असायचा. सगळ्यांना हा कार्यक्रम ऐकता यावा म्हणून या आकाशवाणी केंद्रांनी आपापल्या वेळा वाटून घेतल्या होत्या. साडेअकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत हे कार्यक्रम चालायचे. मी या केंद्रावरची ‘आपली आवड’ संपली की पुढच्या केंद्रावर पळायचो, तिथली ‘आपली आवड’ संपली की त्याच्या पुढच्या केंद्रावर पळायचो. हमखास, चुकू न देता ‘जैत’चं गाणं ऐकायचो. कारण तेव्हा ही गाणी ऐकण्यासाठी रेडिओशिवाय मला दुसरा पर्यायच नव्हता आणि या गाण्यांनी तर वेड लावलेलं होतं.

रानात आखाड्यावर रविवारी दिवसभर मी ही गाणी ऐकत बसायचो. मी माझा रेडिओ कधी बंद करून पाहिला, तर रानावनातून सगळीकडून ‘जैत''च्या गाण्यांचे आवाज यायचे. त्या काळात आजच्या मोबाइलसारखा रेडिओ लोकप्रिय झालेला होता. लग्नात जावयाला हमखास रेडिओ मिळायचा. सासऱ्याने रेडिओ दिला नाही तर जावई रेडिओसाठी रुसून बसायचे. मग तातडीनं तालुक्याला माणूस पाठवून रेडिओ विकत आणला जायचा. जावयाला दिला जायचा. त्यामुळे शेतातल्या सगळ्या आखाड्यांवर रेडिओ नक्की असायचा. शेतकऱ्यांची माझ्यासारखी आडनिड्या वयाची पोरं कायम कानाला रेडिओ लावून बसलेली असायची.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT