National Education Policy  Agrowon
ॲग्रो विशेष

National Education Policy : कृषी अभ्यासक्रमातून पशुसंवर्धन, दुग्धशास्त्राला कात्री !

Agriculture Curriculum : देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्राचे महत्त्व कमी करण्यात आले आहे.

 गोपाल हागे

Akola News : देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्राचे महत्त्व कमी करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील कृषी विद्यापीठ, या विद्याशाखेचे विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांमध्ये याबाबत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या विषयाच्या अनुषंगाने आता विद्यार्थी सोमवारी (ता.१६) महाराष्‍ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदनही देणार आहेत. या मुद्यावर वेळप्रसंगी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात कृषी अभ्यासक्रमामध्ये व्यापक प्रमाणात बदल झाले आहेत. यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) सहाव्या अधिष्ठाता समितीचा अहवाल हा संदर्भ म्हणून पुढे करण्यात आलेला आहे. मात्र हा अहवाल जशाचा तसा स्वीकारताना राज्यातील कृषी अभ्यासक्रमात पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या मोठ्या भागाला गच्छंती लागली आहे. आजवर पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभागास आठ विषय श्रेयांक भार (क्रेडिट लोड) दिला जात होता. या नव्या सुधारणेमुळे तो केवळ दोन एवढा ठेवला आहे. हा प्रकार अन्यायकारक असल्याने याविरुद्ध माजी विद्यार्थी आवाज उठविण्याच्या तयारीत आहेत.

महाराष्ट्रात शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुसंवर्धनाकडे पाहिले जाते. गोसंवर्धन असेल, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन असेल अशा अनेक व्यवसायांची गावागावांत पाळेमुळे रुजली आहेत. हे व्यवसाय पशुसंवर्धन व दुग्धशास्त्राशी निगडित आहेत. शिवाय विद्यार्थ्यांसोबत शेतकऱ्यांच्या हितावह हा अभ्यासक्रम मानला जातो. असे असताना अभ्यासक्रमास कात्री लावणे योग्य नसल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत.

प्रामुख्याने राज्यात या विषयावर चारही कृषी विद्यापीठांमध्ये काम चालते. संशोधनाला दिशा दिली जाते. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) सहाव्या अधिष्ठाता समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार राज्यात कृषी विद्यापीठांतील कृषी पदवी अभ्यासक्रमात पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागासाठी एकच (एक) विषय प्रस्तावित करण्यात आला आहे.

अधिकार वापराची गरज

यापूर्वी सन २०२६-१७ मध्ये पाचव्या अधिष्ठाता समितीने देखील पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागाचे विषय कमी केले होते. परंतु महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदेने स्वतःच्या ३० टक्के अधिकारांचा वापर करून पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे चार विषय कृषी अभ्यासक्रमात समाविष्ट केले होते व गुणांक भार वाढवला होता.

त्याप्रमाणेच याहीवेळी ३० टक्के अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदेने सन २०२४-२५ च्या सहाव्या अधिष्ठता समितीच्या अहवालामध्ये बदल करून कृषी अभ्यासक्रमात पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे चार विषय समाविष्ट करावेत व गुणांक भार वाढवावा, अशी मागणी केली जात आहे. या विषयाला धरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे. येत्या काळात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान हा विषय उचलला जाऊ शकतो.

सहाव्या अधिष्ठाता समितीच्या अहवालानुसार कृषी पदवीच्या अभ्यासक्रमांमधून पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विषय कमी करून ४ वरून १ इतके करण्यात आलेले आहे. विभागाचा पदवी अभ्यासक्रमामध्ये असणारा एकूण भारांक ८ वरून २ इतका करण्यात आला आहे. यामुळे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागामध्ये पदव्युत्तर पदवी अथवा आचार्य पदवीचे शिक्षण घेतलेल्या, घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे, असे अहिल्यानगर येथील माजी विद्यार्थी डॉ. श्रीकांत गाडेकर यांनी सांगितले.

--काही महत्त्वाचे मुद्दे

- कृषी शैक्षणिक अभ्यासक्रम १० वर्षांनी बदलला जातो

- पाचव्या अधिष्ठाता समितीच्या अभ्यासक्रमाला आठ वर्षे लोटली

- सहाव्या अधिष्ठाता समितीच्या अहवालानुसार अभ्यासक्रमात बदलाच्या हालचाली

- नव्या पद्धतीने अभ्यासक्रम लागू केल्यास पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना बेरोजगारीची भिती

सदर समितीच्या अहवालामध्ये विद्यापीठांच्या भौगोलिक स्थितीनुसार, पीकसंस्कृती नुसार, स्थानिक गरजेनुसार अभ्यासक्रमामध्ये ३० टक्के बदल करण्याची परवानगी दिलेली असताना देखील घाईगडबडीने कुठलाही अभ्यासक्रम सुनिश्‍चित न करता तो लागू केला गेला आहे. या निर्णयाला विभागातील सर्व आजी, माजी पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्याचा विरोध असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
डॉ. श्रीकांत गाडेकर, माजी विद्यार्थी, अहिल्यानगर
कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र हा विषय कमी करायला नको. पशुसंवर्धन हा विषय शेतीपासून वेगळा नाही. व्हेटरनरी सायन्सेसचे विद्यापीठ वेगळे झाले. व्हेटरनरी सायन्सेस म्हणजे जनावरांची निगा, रोगराई, खाद्य हा भाग त्यांच्यासाठी स्पेशलायझेशनचा विषय आहे. पशुसंवर्धन हा विषय कृषीमध्येच असायला हवा. हा बदल मला योग्य वाटत नाही.
डॉ. व्यंकट मायंदे, माजी कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT