Shivraj Singh Chouhan : आगामी खरीप हंगाम २०२५ साठी खतांच्या गरजेसाठी राज्यांशी समन्वय ठेवला जात असल्याचं केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं आहे. कृषिमंत्र्यांनी नवी दिल्ली येथील कृषी भवनात साप्ताहिक आढावा बैठक घेतली. या बैठकीला कृषी सचिव देवेश चतुर्वेदी आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ मर्यादित म्हणजेच नाफेड आणि राष्ट्रीय बागायती मंडळ अर्थात एनएचबीच्या कामकाजाचा आढावा कृषिमंत्र्यांनी घेतला. तसेच शेतकरी हितासाठी आवश्यक सूचना केल्याचं कृषी विभागाने सांगितलं आहे.
देशात खतांची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मागील रब्बी हंगामाच्या सुरुवातीला खत टंचाईनं खतांचा काळाबाजार फोफवला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळालं नाही. तसेच खतांच्या गोणीसाठी जादाचे पैसेही मोजावे लागले.
२०२५ चा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे शेतकरी निविष्ठा खरेदीचं नियोजन करत आहेत. त्यामुळे ऐन हंगामात खत आणि बियाणे टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच कृषी निविष्ठांच्या दराचा आढावाही कृषिमंत्र्यांनी या बैठकीत घेतला आहे.
पिकांची कापणी, पेरणी, खरेदी, खतं, बियाण्यांची उपलब्धता, हवामान व जलाशयाची स्थिती याची माहिती कृषिमंत्र्यांनी घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी मागील वर्षीच्या तुलनेत जलाशयाची पाणीपातळी सुधारल्याचं सांगितलं.
देशातील १६१ जलाशयामध्ये उपलब्ध पाणी साठा मागील वर्षीच्या तुलनेत ११८ टक्के आहे. तर मागील १० वर्षीच्या सरासरी तुलनेत ११९ टक्के असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसेच बागायत क्षेत्रात वाढ झाल्याचा दावा एनएचबीकडून करण्यात आला. यावेळी टोमॅटोसह नाशवंत पिकांसाठी शेतकऱ्यांना योग्य दर मिळावेत, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले.
भात पिकाखालील क्षेत्रात वाढ
उन्हाळी हंगामात २७ एप्रिल २०२५ पर्यंत भात पेरणी क्षेत्रात ४.०३ लाख हेक्टर वाढ झाली आहे. भाताचं क्षेत्र २७.६४ लाख हेक्टरवरून ३१.६७ लाख हेक्टरवर पोहचलं आहे. तसेच कडधान्याखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. मूग क्षेत्रात ३.१३ लाख आणि उडीद क्षेत्रात ०.४३ लाख हेक्टरची वाढ झाली आहे, असा दावाही या साप्ताहिक बैठकीत करण्यात आला आहे.
गहू पिकाची स्थिती
देशात रब्बी हंगामात गहू प्रमुख पीक आहे. गव्हाच्या उत्पादनाता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान व बिहार या राज्यांचा वाटा सर्वाधिक आहे. २५ एप्रिल २०२५ पर्यंतच्या गहू काढणीच्या आकडेवारीनुसार मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये १०० टक्के गहू काढणी झाली आहे. तर हरियाणा ९२ टक्के, उत्तर प्रदेश ८८ टक्के, बिहार ८८ टक्के आणि पंजाब ८० टक्के गव्हाची काढणी पूर्ण झाली आहे.
तांदूळ आणि गव्हाचा संरक्षित साठा
देशातील गहू आणि तांदळाचा संरक्षित साठा (बफर साठा) वाढल्याचं नाफेडच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितलं. गव्हाचा साठा ११७.९४ लाख टन आहे. तर तांदळाचा साठा ३८२.०९ लाख टन आहे. दोन्हींचा साठा बफर साठ्याच्या मानक तुलनेत २१०.४० लाख टन अधिक असल्याचा दावाही नाफेडच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केला आहे. यावर कृषिमंत्री चौहान यांनी ग्राहकांना स्वस्तात धान्य मिळावं आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.