डॉ. बी. डी. जडे
Fertilizer Application : पारंपरिक पद्धतीने पाणी आणि रासायनिक खतांचा जमिनीसाठी वापर न करता पिकांसाठी वापर करायला शिकले पाहिजे. ठिबक सिंचन संच बसविताना पाण्यात विरघळणारी खते देण्यासाठी फर्टिलायझर टॅंक किंवा व्हेंचुरी बसवून घ्यावी.
पि कांच्या सर्वांगीण वाढीसाठी पाणी आणि पोषक अन्नद्रव्ये महत्त्वाची आहेत. अधिक उत्पादन आणि उत्कृष्ट गुणवत्ता मिळविण्यासाठी या दोन घटकांचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. यांच्या वापराचे नियंत्रण आपल्या हाती असल्यामुळे पिकाच्या गरजेनुसार, अवस्थेनुसार पाणी आणि अन्नद्रव्ये पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात थेंबाथेंबाने अधिक काळापर्यंत देता येतात.
पिकांच्या सर्वांगीण वाढ होण्यासाठी सतरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. प्रत्येक अन्नद्रव्यांचे कार्य वेगळे असल्यामुळे दुसरे अन्नद्रव्य त्याची उणीव भरून काढू शकत नाही. पिकांच्या प्रत्येक वाढीच्या अवस्थेत वेगवेगळे अन्नघटकांची आवश्यकता असते. पिकांच्या वाढीसाठी १७ अन्नद्रव्यांची आवश्यकता असते.
पिकांच्या विविध अवस्था
पेरणी किंवा रोपांच्या पुनर्लागवडीनंतर वाढीच्या विविध अवस्था आहेत. सुरुवातीस वाढीच्या कालावधीमध्ये नत्राची आवश्यकता अधिक असते. अशा वेळी स्फुरद आणि पालाशची आवश्यकता कमी प्रमाणात असते.
अशा वेळी नत्र, स्फुरद आणि पालाशचे प्रमाण ३:१:१ किंवा २:१:१ असे असावे. या अवस्थेत १९:१९:१९ या ग्रेड सोबत युरिया खताचा उपयोग करावा. माती परीक्षण नुसार विद्राव्य खतांचा वापर फायदेशीर असतो.
वाढीच्या अवस्थेनंतर पिकांमध्ये पुनरुत्पादनाची अवस्था येते, त्या वेळी सूक्ष्म फळांची निर्मिती होते, फुले लागतात, फळधारणा होते, फळांची वाढ होत असते अशा वेळी स्फुरदाची गरज अधिक असते. अशावेळी नत्र आणि पालाशचा वापर कमी करावा.
अशा वेळी नत्र, स्फुरद आणि पालाशचे प्रमाण १:३:१ किंवा १:२:१ असावे. फुले अधिक यावीत, फळधारणा उत्तम व्हावी, फळांचा, फळभाजीपालांचा आकार मोठा होण्यासाठी १३:४०:१३ किंवा ०:५२:३४ या विद्राव्य खताच्या ग्रेडसोबत युरिया खताचा वापर करावा. नत्राचा अधिक वापर केल्यास पिकांना फुले उशिरा लागतात.
पुनरुत्पादन अवस्थेनंतर पिके तसेच फळे पक्व होत असतात. या पक्वतेच्या अवस्थेकडे जात असताना फळांना आकर्षक रंग, अधिक गोडी तसेच फळांना अधिक वजन मिळण्यासाठी पोटॅशची अधिक गरज असते. अशावेळी नत्र आणि स्फुरदाची गरज अतिशय कमी असते.
या अवस्थेमध्ये नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण १:०:३.५ असावे. या अवस्थेत १३:०:४५ किंवा ०:०:५० या ग्रेडसोबत थोडा युरिया खताचा वापर करावा. पोटॅशचे अधिक शोषण होण्यासाठी नत्राचा अल्प वापर करावा.
पक्वतेच्या वेळी नत्राचा वापर अधिक केल्यास फळांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो. पक्वता उशिरा येऊन फळे उशिरा काढणीला येतात. टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, गुलाब, कार्नेशन, जरबेरा ही पिके अधिक काळापर्यंत घ्यावयाची असल्यास नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रमाण २:१:३ असे ठेवावे. यासाठी १६:८:२४ या विद्राव्य खतांचा ग्रेडचा वापर करावा.
नत्रासाठी जमिनीतील तापमानानुसार युरिया किंवा अमोनिअम सल्फेट किंवा कॅल्शिअम नायट्रेटचा उपयोग करावा. ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचा (फर्टिगेशन) वापर करीत असताना प्रत्येक अन्नद्रव्याचे कार्य माहिती असणे गरजेचे आहे. कोणत्या अवस्थेत कोणत्या अन्नद्रव्याची गरज आहे या बाबत माहिती असावी.
डॉ. बी. डी. जडे, ९४२२७७४९८१
(वरिष्ठ कृषिविद्या शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.