Parbhani News : वातावरणातील बदलांमुळे शेतीतील समस्या जटिल होत आहेत.जिरायती क्षेत्र बहुल मराठवाड्यातील शेतकरी तापमानवाढ, अवर्षण, अतिवृष्टी, पूर, गारपीट आदी नैसर्गिक संकटांशी झुंज देत शेती करत आहेत. अनिश्चित पर्जन्यमानाच्या स्थितीत मृदा जलसंधारणावर भर द्यावा लागेल.
उत्पन्नाच्या पर्यायी स्रोतासाठी दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कटपालन, रेशीम उद्योग, मत्स्यपालनाचा समावेश असलेल्या एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करावा लागेल, असे प्रतिपादन ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माजी उपमहासंचालक (नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन) डॉ. अनिल कुमार सिंह यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व कृषी विभाग यांच्यातर्फे मंगळवारी (ता. १७) कृषी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित रब्बी पीक परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. इंद्र मणी अध्यक्षस्थानी होते.बुलंदशहर (उत्तर प्रदेश) येथील सनशाईन व्हिजीटेबल प्रा. लि. चे संचालक कर्नल सुभाष दैशवाल, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, पी. डी. निर्वळ, दीपक कशाळकर, उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे, मुख्य विस्तार शिक्षण अधिक डॉ. प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सिंह म्हणाले, की शेती हा सर्वांत मोठा खाजगी उद्योग आहे. पहिली हरितक्रांती बागायती शेतीत झाली, तर दुसरी क्रांती ही जिरायती शेतीमध्ये असेल. जलसंधारणातून पावसाचे अधिकाधिक पाणी अडविले, तर जिरायती शेतीतून अधिक उत्पादन मिळू शकेल. दैशवाल म्हणाले, की शेतीमाल विपणन प्रक्रियेतील अडत्यांकडून होणारे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना समूहांनी एकत्र यावे लागेल.
शेतीसाठी आवश्यक ज्ञानासोबत शेतीमाल विक्री, बँकिंग आदी विषयाचे ज्ञान आत्मसात करावे लागेल. डॉ. इंद्र मणी म्हणाले, की व्यक्ती केंद्रित नव्हे तर व्यवस्था केंद्रीय विस्तार कार्य करावे लागेल. शेतीमध्ये विविध विज्ञान शाखांचा समावेश आहे. रब्बी बियाणे विक्रीचा प्रारंभ करण्यात आला.
जैविक कीड व्यवस्थापन, तुती रेशीम उद्योग तंत्रज्ञान पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. कोरडवाहू शेतीत सुधारित तंत्रज्ञानाचा स्वीकारलेल्या भारत आव्हाड, कृष्णा पारधे, ज्ञानोबा पारधे, शिवाजी दळवी, बाळासाहेब पारधे यांचा गौरव करण्यात आला. स्नेहल हरकळ हिने शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. रब्बी पीक लागवड तंत्रज्ञान, कीड, रोग व्यवस्थापनावर शास्त्रज्ञांनी माहिती देण्यात आली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.