Mahad News : गणेशोत्सव काळात फळांची आवक वाढल्याने भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. सर्व प्रकारची फळे बाजारात उपलब्ध झाली असून महाडमध्ये सुमारे २५-३० टन फळांची आवक झाली होती. फळांच्या अनेक दुकानांमध्ये व गाड्यांवर स्वस्त भावात असलेल्या फळांची विक्री वाढली आहे, तसेच अनंत चतुर्दशीपर्यंत भावात सातत्य राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आवक कमी असल्याने श्रावण महिन्यात फळांना चांगल्या प्रकारे भाव मिळाला होता. श्रावण महिन्यात वेगवेगळे व्रतवैकल्ये असल्याने फळांचे भाव वधारले होते. आता गणेशोत्सवात गणपती व गौरीला प्रसादाकरिता फळांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या काळात दररोज पाच फळांचा नैवेद्य दाखवला जातो.
याच काळात हरितालिका व गौरीचे उपवासही केले जात असल्याने फळांची मागणी वाढत असते. दीड व पाच दिवसांच्या गणेशाचे जरी विसर्जन झाले असले तरी अनंत चतुर्दशीपर्यंत फळांची मागणी टिकून राहणार आहे. यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठा फळांनी गजबजलेल्या आहेत. गणेशोत्सवामध्ये पाच फळांची मागणीही वाढलेली आहे. दुकानदारांनी किमान ५० रुपयांपासून पाच फळांची विक्री सुरू केली आहे.
सध्या बाजारामध्ये सफरचंद, संत्री, मोसंबी, डाळिंब, पेरु, चिकू, सिताफळे, नासपती पपई व केळी या फळांना विशेष मागणी असून त्यांची आवकही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. सफरचंदासह अन्य फळांचे दर आवाक्यात असल्याने फळे खरेदी वाढली आहे.
गणेशोत्सवामध्ये अनेक भाविक मांसाहार वर्ज्य करत असल्याने फळांकडे ग्राहक वळतात. यामुळे फळांच्या किमतींमध्ये चांगलीच घसरण झाली आहे. महाडच्या बाजारपेठेमध्ये मोठे पेरु व डाळिंब शंभर रुपयाला एक ते दीड किलो विकली जात आहेत. सफरचंद १०० ते १२० रुपये किलो विकले जात आहेत. संत्री-मोसंबी ६०-७० रुपये किलोने विकली जात आहे. फळांच्या भावामध्येही घसरण झाल्याने ग्राहक खरेदी करत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.