Sangli Farmers : शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना रद्द करण्याबाबत राज्य सरकारकडून पावले उचलली जात असली तरी अद्याप हा महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली नाही. हा महामार्ग कायमस्वरूपी रद्द व्हावा, यासाठी ३० सप्टेंबर २०२४ ला सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. कवलापूर (ता. मिरज) येथे शेतकरी कामगार पक्ष व महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना रद्द करावी, यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह अन्य १० जिल्ह्यातही समितीतर्फे सातत्याने आंदोलने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर कवलापुरातील बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचा निर्णय घेण्यात आला.
मोर्चाचे संयोजक दिगंबर कांबळे म्हणाले की, 'शक्तिपीठमुळे बागायत शेती उद्ध्वस्त होणार आहे. अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. पुराचा धोकाही वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा महामार्गाला विरोध आहे. शासनाने हा महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा अशी आमची मागणी आहे. मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.
बैठकीला संघर्ष समितीचे संपर्क प्रमुख शरद पवार, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, रमेश कांबळे गजानन पाटील, भूषण गुरव, विष्णू सावंत, प्रकाश टकले, गजानन सावंत उत्तम पाटील, राहुल जमदाडे, श्रेयसा लांडगे, बाळासाहेब लांडगे, विकास खादे आदी उपस्थित होते.
राजू शेट्टींना आलेल्या पत्राने खळबळ
गोवा ते नागपूर या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध झाल्यानंतर भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्याची शक्यता आहे. परंतु सरकारने नवी खेळी करत शेतकऱ्यांना पाच पट मोबदला देण्याची तयारी दाखवली आहे. याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाकडून माजी खासदार राजू शेट्टी यांना तसे पत्र पाठविले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.