Orchard Planting
Orchard Planting Agrowon
ॲग्रो विशेष

Orchard Planting : मुरमाड जमिनीत फुलले हिरवं स्वप्न !

 गोपाल हागे

अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुनील विनायकराव जानोरकर यांनी कुंभारी (जि. अकोला) गावाच्या परिसरात चार एकर कोरडवाहू, खडकाळ जमीन विकसित करून फळबाग (Orchard Planting)

फुलवली आहे. अकोला शहरापासून कुंभारी शिवार बारा किलोमीटर अंतरावर आहे. कुंभारी शिवारामध्ये अवघ्या दीड फुटानंतर मुरूम लागतो. सुनील जानोरकर यांनी २०१९ मध्ये ही जमीन खरेदी केली. या जमिनीत पूर्वी वर्षानुवर्षे खरीप हंगामामध्ये जुजबी स्वरूपात पिकांची लागवड केली जात होती. अशी कोरडवाहू जमीन (land) विकसित करण्याचे आव्हान

त्यांनी स्वीकारले. शेती नियोजनासाठी त्यांना या भागातील शेती अभ्यासक विजय खवले यांची मोलाची साथ मिळाली आहे. जमीन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदा दीड लाख रुपये खर्च करून शेतीला तार कुंपण केले. त्यामुळे भटक्या जनावरांचा त्रास थांबला

विविध फळपिकांची लागवड

सिंचनासाठी सुनील जानोरकर यांनी २०१९ मध्ये कूपनलिका खोदली. कोरडवाहू क्षेत्र असल्याने पाणी लागेल की नाही याबाबत साशंकता होती. परंतु कूपनलिकेला थोडे पाणी लागले. उपलब्ध पाण्याद्वारे फळबागेला ठिबक सिंचन होऊ शकेल याची खात्री पटल्यानंतर त्यांनी

चार एकरात दोन वर्षांपूर्वी मोसंबी लागवडीचा निर्णय घेतला. या भागात मोसंबीची फारशी लागवड झालेली नाही. मात्र अकोला शहर फळांसाठी चांगली बाजारपेठ उपलब्ध असल्याचे लक्षात घेऊन जानोरकर यांनी जाणीवपूर्वक मोसंबीची निवड केली. यासाठी अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील फळबाग तज्ज्ञांशी चर्चा केली.

जळगाव येथील शासनमान्य रोपवाटिकेतून त्यांनी मोसंबीची दर्जेदार १२०० कलमे विकत आणली. तसेच दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून आंब्याच्या केसर, आम्रपाली, तोतापुरी, दशहरी, सिंधू, हापूस, रत्ना, मल्लिका या जातींची १५० कलमे आणली. मोसंबी, आंब्याच्या बरोबरीने त्यांनी बहाडोली जांभूळ, सीताफळ, पेरू, कालीपत्ती चिकू, काजू, हनुमान फळ, पपनस, नारळ अशा विविध फळझाडांची लागवड केली आहे.

फळझाडांच्या ओळींमध्ये ठिबकच्या दोन नळ्या अंथरून ड्रीपर बसवले. कलमांच्या गरजेनुसार पाणी, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो. दोनच वर्षात ही सर्व फळझाडे सक्षमपणे वाढली आहेत. काही कलमांवर फळधारणेस चांगली सुरुवात झाली. आता बागेतील सर्व कलमे बहर नियोजनाच्या दृष्टीने तयार होत आहेत.

कुटुंबाची सक्षम साथ ः सुनील जानोरकर हे जिल्हा परिषदेत नोकरीला लागून ३७ वर्षे झाली आहेत. नोकरीची काही वर्षेच शिल्लक आहेत. आयुष्याच्या पुढील टप्याच्या दृष्टीने त्यांनी जाणीवपूर्वक फळबागेच्या नियोजनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. जानोरकर यांचे मूळगाव महान (ता. बार्शी टाकळी) आहे. त्यांच्या कुटुंबात वडिलोपार्जित काही शेत जमीन होती.

परंतु आवड असूनही नोकरीमुळे पुरेसा वेळ शेतीसाठी देणे शक्य नव्हते. अखेरीस २०१९ मध्ये त्यांनी फळबाग करण्याचा निश्चय केला. कुंभारी शिवारात चार एकर मुरमाड जमीन विकत घेतली. तलाठी असलेल्या पत्नी रेणुका यांना त्यांनी प्रकृतीच्या कारणाने स्वेच्छा निवृत्ती घ्यायला लावली. त्यांच्या निवृत्तीचा जो पैसा हाती आला तो पूर्णतः जमीन खरेदीसाठी वापरला.

आता रेणूकाताई देखील फळबागेच्या व्यवस्थापनात रमलेल्या आहेत. आई कुसुम, मुलगा हिमांशू, मुलगी अरुंधती यांची देखील शेती नियोजनात चांगली साथ मिळते. येत्या काळात कुंभारी परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करून शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करण्याचे त्यांनी नियोजन केले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची स्वतःची विक्री व्यवस्था उभी करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

शेतीचे व्यवस्थापन ः जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या जनसंपर्क विभागात प्रशासन अधिकारी असल्याने जानोरकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात कार्यालयीन जबाबदारी आहे. पाच दिवसांचा आठवडा सुरु झाल्यापासून सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहापर्यंत कार्यालय सुरू असते. त्यामुळे शेतीसाठी त्यांना शनिवार, रविवारचा वेळ उपलब्ध होतो. त्यातही काही वेळा अचानक कार्यालयीन काम आले तर याही दिवशी शेतीवर जाणे शक्य राहत नाही.

त्यामुळे शनिवार, रविवारी जसा वेळ मिळेल तसे ते शेतावर जातात. या वेळी पुढील आठवड्यात करावयाच्या कामांचे नियोजन करतात. मार्गदर्शक तथा बाग व्यवस्थापक विजय खवले यांच्यासोबत चर्चा करून सिंचन, खत, कीड, रोग नियंत्रणासाठीच्या उपाययोजना तसेच बागेतील कामांची तयारी केली जाते. फळझाडांच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी सेंद्रिय खते, कीडनाशकांच्या वापरावरच भर दिला आहे.

फळबागेमध्ये पूर्णवेळ लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी एक कुटुंब निवासी स्वरूपात कामाला ठेवले आहे. योग्य पद्धतीने केलेल्या व्यवस्थापनातून जानोरकर यांनी मुरमाड जमिनीतही हिरवे स्वप्न साकारले. मोसंबी बाग उभी केली. आता या बागेत बहर नियोजन सुरू आहे. शासकीय कामातील व्यवस्थापनाचा अनुभव त्यांना फळबागेच्या नियोजनातही उपयुक्त ठरतो आहे. जानोरकर परिसरातील शेतकरी गटाचे सदस्यदेखील झाले आहेत.

जमीन सुपीकतेवर भर

कोरडवाहू, मुरमाड जमीन विकसित करण्यापूर्वी सुनील जानोरकर यांनी सर्व गोष्टींचे नियोजन केले. जमिनीचे गरजेनुसार सपाटीकरण करून घेतले. पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक कल पाहून फळझाडांच्या लागवडीसाठी गादीवाफे तयार केले. गादीवाफ्यामध्ये शेणखत, जैविक घटकांचा वापर करून सुपीकता वाढविण्याचा चांगला प्रयत्न केला.

बागेतील गवत व इतर झाडांचे अवशेष जागेवरच कुजविण्यास सुरुवात केली. यातून गेल्या दोन वर्षांत जमिनीची सुपीकता वाढवण्यास मोठी मदत होत आहे. जमिनीत दीड फुटावर मुरूम असला, तरी गादीवाफा आणि ठिबक सिंचनामुळे फळझाडे ताकदीने वाढत आहेत. चार एकराला लागूनच आणखी दोन एकर जमीन त्यांनी खरेदी केली. त्यामध्ये केसर आंबा लागवडीचे नियोजन सुरू केले आहे. यासाठी कलमे त्यांनी आणून ठेवली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

SCROLL FOR NEXT