Satara News : दुष्काळासह शेतीला पूरक असलेल्या दुग्ध व्यवसायाला केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका बसत आहे. दूध भुकटी आयातीमुळे दूध संस्थांसह शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर गंभीर परिणाम होणार आहे.
सध्या लिटरला दोन रुपये कमी झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रोज ३५ लाख ४० हजार ८०० रुपयांचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून वाढत्या खर्चामुळे जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी घरी दोन-चार जनावरे सांभाळली आहेत. त्यातून दूध व्यवसाय शेतकरी करतात. प्रामुख्याने दुष्काळी तालुक्यांत सर्वाधिक दुग्ध व्यवसाय केला जात आहे. त्यामध्ये गाईंची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातील गाईंपासून १२ लाख ९० हजार ६०० लिटर तर म्हशींपासून तीन लाख ९०० लिटर दूध निर्मिती होते.
यातून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. जिल्ह्यात पाऊसमान कमी झाल्याने चारा टंचाईचे संकटही भीषण झाले होते. यातूनही दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांनी टिकवला आहे. मात्र दूध भुकटी आयात करण्यामुळे दुग्ध उत्पादकांसह दूध संस्था अडचणीत येणार आहेत. या निर्णयामुळे दुधाच्या दरात अजून घसरण झाली तर शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ येईल.
जिल्ह्यातील भुकटीचे करायचे काय?
जिल्ह्यात प्रतिदिन तीन ते साडे तीन लाख लिटर दुधापासून २७ ते २८ टन दूध भुकटी निर्माण होत आहे. भुकटी आयातीच्या निर्णयामुळे जिल्ह्यात तयार होणारी भुकटीचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भुकटी आयातीचा फटका दूध संकलन करणाऱ्या संस्थांना बसणार असल्याने दूध संकलनावरही परिणाम होणार आहे.
सध्या शेतकऱ्यांना दुधाला मिळत असलेले दर न परवडणारे आहेत. त्यात दूध भुकटी आयात करण्याने दुधाचे दर कमी होतील. हे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेत असून यातून जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय संपणार आहे.- पंजाबराव पाटील, अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.