Ratnagiri News : पावसाने विश्रांती घेतली असली तरीही रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील ४९ धरणांमध्ये ८० टक्के पाणी असून २९ धरणे शंभर टक्के भरली आहेत. गतवर्षीएवढाच पाणीसाठा जिल्ह्यातील धरणांमध्ये शिल्लक आहे.
राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून, त्यांचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. स्थानिक परिस्थितीनुसार धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील बैठकीत दिले.
राज्यात कोकण आणि नागपूर विभागात हलका पाऊस झाला आहे; पण उर्वरित जिल्ह्यात पाऊस कमी आहे. राज्यात परिस्थिती गंभीर असताना पावसाची कोकणावर मेहरनजर आहे. जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. रत्नागिरीतील ४९ धरणांत ८० टक्के साठा आहे, तर अर्जुना मध्यम प्रकल्प, मुचकुंदी, चिंचवाडी आणि ओझर या प्रमुख धरणांसह २९ धरणे पूर्ण क्षमतेनी भरली.
गोपाळवाडी, साखरपा, तेलेवाडी, कडवई, निवे, रांगव, शीळ, शिपोशी, व्हेळ, गवाणे, झापडे, बेणी, केळवण, मुचकुंदी, इंदवटी, अर्जुना मध्यम प्रकल्प, चिंचाळी, तुळशी, तिडे, सोंडेघर, सुकोंडी, पंचनदी, शिरवली, गुहागर, फणसवाडी, मालघर, अडरे, खोपड, मोरवळ.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक आहे. गतवर्षीप्रमाणेच धरणे भरली आहेत. एकूण धरणांपैकी २० धरणे पूर्णतः भरली नाहीत. ती सप्टेंबरअखेर पर्यंत भरतील.- विजय थोरात, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.