Sugar Production
Sugar Production Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : देशात २६० लाख टन साखर उत्पादन; ६१ कारखान्यांची धुराडी बंद

Team Agrowon

Navi Delhi News : देशातील गाळप हंगाम (Sugarcane Crushing) आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. फेब्रुवारीअखेर देशातील ६१ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (National Co-operative Sugar Factories Federation) स्पष्ट केले. देशात २६० लाख टन साखरेचे उत्पादन झाले.

तर २ हजार ६५३ लाख टन उसाचे गाळप झाले. देशातील साखर उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज असला तरी पुढील वर्षी साखर उत्पादन (Sugar Production) वाढण्याचा अंदाज आहे. तसेच संभाव्य एल निनोमुळे ऊस हंगामावर परिणाम होणार नाही, असेही महासंघाने सांगितले.

देशभरातील ४६३ साखर कारखान्यांनी यंदा गाळप सुरु केला. मागीलवर्षीपेक्षा यंदा २५ कारखाने कमी सुरु झाले. फेब्रुवारीअखेर २ हजार ६५३ लाख टन उसाचे गाळप झाले. गतवर्षी याच काळात झालेल्या गाळपापेक्षा यंदा १०२ लाख टनाने अधिक गाळप झाले.

ऊस गाळपातून २६० लाख टन साखर उत्पादन झाले. गेल्यावर्षी २५३ लाख टन साखर मिळाली होती. यंदा साखर उतारा मात्र घटला. गेल्यावर्षी ९.९३ टक्के उतार मिळाला होता. तो यंदा ९.७८ टक्क्यावर आला.

फेब्रुवारी अखेर देशातील ६१ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. तर मार्च अखेर देशातील निम्म्यापेक्षा अधिक कारखान्यातील गाळप हंगाम संपण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने चालू हंगामात ३३४ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज केला. मागील हंगामात ३५९ लाख टन साखर उत्पादन झाले होते.

म्हणजेच यंदा साखर उत्पादन २५ लाख टनाने कमी राहण्याचा अंदाज आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले.

देशातील एकूण साखर उत्पादन ३७९ लाख टन होणे अंदाजित आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले. यापैकी सुमारे ४५ लाख टन साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर होणार आहे. तर ३३४ लाख टन साखरेचे निव्वळ उत्पादन होईल.

देशाचा वार्षिक साखरेचा खप २७५ लाख टन आहे. हंगामाच्या सुरुवातीला ६२ लाख टन शिल्लक साठा होता. तर यंदा ६१ लाख टन साखर निर्यातीचा अंदाज आहे. तसेच पुढील हंगामासाठी ६० लाख टन साखर शिल्लक राहू शकते.

यातून ऑक्टोबर नंतरचा अडीच ते तीन महिन्याचा स्थानिक खप भागू शकणार आहे, असे नाईकनवरे यांनी सांगितले. त्यांच्या मते ही अंदाजित आकडेवारी साखरेचे स्थानिक दर स्थिर ठेवण्यास हातभार लावतील .

पुढील हंगामात साखर उत्पादनवाढीचा अंदाज

महाराष्ट्र तसेच लगतचा कर्नाटक, गुजरात या राज्यात लांबलेला पाऊस आणि परतीच्या पावसामुळे विलंबाने सुरु झाला. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या काळातील ढगाळ वातावरणामुळे उभ्या उसाला आवश्यक असणारा सूर्यप्रकाश मिळाला नाही.

त्याचा प्रतिकूल परिणाम उसाच्या वजनावर आणि त्यातील साखरेच्या प्रमाणावर झाला. मात्र गतवर्षीच्या खोडवा उसाचे प्रमाण नव्या हंगामात कमी राहणार असून त्याचा अनुकूल परिणाम पुढील वर्षी दिसेल. ऑक्टोबर २३ ते सप्टेंबर २४ या वर्षी साखरेचे उत्पादन पुन्हा एकदा भरारी घेण्याचा अंदाज आहे.

एल निनोचा पुढील हंगामावर परिणाम होणार नाही

अमेरिकेच्या हवामान खात्याने जुलै अखेर येणाऱ्या एल निनोच्या संकटाची जाणीव करून दिली असली तरी गतवर्षी झालेल्या अतिरिक्त पर्जन्यमानामुळे भरलेली धरणे, जल साठे आणि जमिनीत ओलावा चांगला असेल. त्याचप्रमाणे एल निनोचा प्रकोप होण्याच्या अगोदर म्हणजे जून, जुलै मध्ये सर्वसाधारण पर्ज्यवृष्टी होणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्रासह देश पातळीवर ऊस तसेच साखर उत्पादन आणि गाळप हंगाम यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, असा अंदाजही राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT