Agrim Pik Vima News : राज्यातील १७ जिल्ह्यांमधील २४ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना अग्रीम भरपाई देण्यास विमा कंपन्या तयार झाल्या आहेत. या शेतकऱ्यांना १ हजार ३२६ कोटी रुपये भरपाई मिळणार आहे.
तर पुणे आणि सांगली जिल्ह्यात पेरणीच होऊ न शकलेल्या २६ हजार ३०० शेतकऱ्यांना जवळपास २६ कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला, असे कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
अग्रीम भरपाईबाबात सध्या खूपच गोंधळाची स्थिती आहे. विमा कंपन्यांनी एकाच जिल्ह्यातील काही मंडळांना काही पिकांना अग्रीम भरपाई देण्यास विरोध दर्शविला आहे. त्याची सुनावणी आणि तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरु आहे.
आतापर्यंत १७ जिल्ह्यांमध्ये तोडगा निघाला. काही जिल्ह्यांमध्ये संपूर्ण तोडगा निघाला तर काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात प्रश्न सुटला. काही प्रमाणात म्हणजे, काही जिल्ह्यातील पीक विमा कंपन्यांनी काही मंडळांना अग्रीम भरपाई देण्यास विरोध केला होता.
पण त्याच जिल्ह्यातील काही मंडळांना भरपाई देण्यास कंपन्या तयार होत्या. ज्या मंडळात भरपाई देण्यास कंपन्या तयार होत्या त्या मंडळांना भरपाई देण्याचा मार्ग मोकळा झाला, असेही कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
तसेच काही जिल्ह्यांमध्ये एकाच मंडळात एकापेक्षा अधिक पिकासाठी अग्रीम भरपाईच्या अधिसूचना काढल्या होत्या. पण विमा कंपन्यांनी काही पिकांना अग्रीम देण्यास नकार दिला होता. तर पिकांना अग्रीम देण्यास तयारी दर्शविली होती. याबाबत आता काही मंडळांमध्ये आणि काही पिकांच्या बाबत तोडगा निघाला. अशा मंडळात त्या पिकासाठी अग्रीम भरपाई देण्यात येणार आहे.
१७ जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यांमध्ये पूर्ण तोडगा निघाला. म्हणजेच सहा जिल्ह्यांमध्ये मंडळं, नुकसानीची टक्केवारी आणि कोणत्या पिकांना अग्रीम द्यायचा? यावर पीकविमा कंपन्या आणि प्रशासनामध्ये समेट झाली. कोल्हापूर, परभणी, सांगली, बुलडाणा, जालना आणि नागपूर या सहा जिल्ह्यांमध्ये अग्रीम भरपाईबाबत संपूर्ण तोडगा निघाला. म्हणजेच अग्रीम कोणत्या पिकाला आणि किती मंडळातील शेतकऱ्यांना द्यायचा याविषयीचा पूर्ण निर्णय झाला.
काही प्रमाणात तोडगा निघालेले जिल्हे
छत्रपती संभाजीनगर, नगर, अकोला, धाराशीव, अमरावती, नाशिक, जळगाव, सोलापूर, सातारा आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात तोडगा निघाला.
पेरणीच न झालेल्या शेतकऱ्यांचाही तिढा सूटला
पुणे आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीच होऊ शकली नाही, त्यामुळे विमा भरपाई मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात बाजरी पिकासाठी आणि शिरुर तालुक्यात मूग पिकासाठी भरपाई मिळणार आहे.
या दोन्ही तालुक्यातील १३ हजार २०० शेतकऱ्यांना १८ कोटी ५४ लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे. तर सांगली जिल्ह्यातील १३ हजार १४४ शेतकऱ्यांना ७ कोटी १७ लाख रुपये भरपाईचा मार्ग मोकळा झाला.
कृषी विभागाने सांगितले की, आता कोणत्या शेतकऱ्यांना किती भरपाई द्यायची हे स्पष्ट झाले. आता भरपाई कशी द्याची म्हणजेच एकाट लाॅटमध्ये द्यायची की वेगवेगळ्या टप्प्यात द्यायची हे लवकरच ठरेल. पण ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. त्यासाठी प्रक्रिया सुरु देखील झाली.
इतर जिल्ह्यांचे काय?
अधिसूचना २४ जिल्ह्यांमध्ये निघाल्या होत्या. पण केवळ १७ जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात तोडगा निघाला. मग इतर जिल्ह्यांच काय? तर उरलेल्या सात जिल्ह्यांमध्ये अद्याप सुनावणी सुरु आहे किंवा कंपन्यांनी आपली भुमिका कळवली नाही. काही जिल्ह्यांसाठी कंपन्यांनी सचिवांकडे अपिल केले आहे. त्यामुळे हळूहळू या जिल्ह्यांबाबतही तोडगा निघू शकतो, असे कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.