Grape Export
Grape Export Agrowon
ताज्या बातम्या

Grape Market : द्राक्ष उत्पादकांची फसवणूक कधी थांबणार?

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सांगली ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम (Grape Season) पंधरवड्यापासून सुरू झाला आहे. येत्या आठवड्यात तो आणखी गती घेईल. हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांची दलालांकडून फसवणुकीचे (Fraud With Grape Farmer) प्रकार नवीन नाही.

प्रत्येक वर्षी असे अनेक प्रकार घडतात. तरीही जिल्हा प्रशासन, पोलिस, बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने दलालांच्या नोंदणीकडे दुर्लक्ष होते. नोंदणी नसलेल्या व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादक (Grape Farmer) शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक कोंडी केली जात आहे.

द्राक्ष हंगामात शेतकऱ्यांना थोडे पैसे देऊन व्यापारी विश्‍वास संपादन करून द्राक्षे काढून नेतात. त्यानंतर पाच-पन्नास लाखांची फसवणूक करून दलाल पळून गेल्याच्या आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत.

फसवणूक होते, पोलिसात तक्रारी दाखल होतात, मात्र तपास होत नाही. कारण फसवणूक करण्यासाठीच आलेल्या या दलालांची साधे पूर्ण नाव माहीत नसते. पत्ता माहीत नसतो, असला तरी पत्ता खरा असेल याची काही खात्री नसते. मग त्यांचा शोधायचे कोठे असाही पोलिस प्रशासनासमोर प्रश्‍न असतो.

शेतकऱ्यांना द्राक्ष वेळेत विकण्याची गडबड असते. मध्यस्थ एखादा भागातीलच असतो याचा पद्धतशीर फायदा हे भामटे उचलतात आणि पळून जातात. अनेक दलाल वर्षानुवर्षे परिसरात विश्वाश्‍वासाने व्यवसाय करत आहेत. मात्र त्यांचे शेतकरी आणि कामाची पद्धत ठरलेली असते.

यंदाही द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीला फसवणुकीच्या दोन घटना घडल्या असल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबण्यासाठी दरवर्षी केवळ बैठका होतात.

त्यामध्ये उपाययोजनाही सुचविल्या जातात. जिल्ह्यात येणाऱ्या व्यापाऱ्यांनी नोंदणी करण्याची मागणी केली जाते. परंतु ही नोंदणी कोणी करायची असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने काढलेले उपाययोजना कागदावरच राहतात. त्यामुळे जिल्ह्यात द्राक्ष खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांची नोंदणी प्रशासनाने करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

गतवर्षी तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावातील शेतकऱ्याचे सुमारे ३ कोटी रुपये व्यापाऱ्यांकडून येणे बाकी आहे. मात्र शेतकरी व्यापाऱ्यांकडून थकीत रक्कम मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. परंतु व्यापारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. शेतकऱ्यांनी व्यापारी विरोधात भूमिका घेतली तर व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी येत नाही.

त्यामुळे शेतकरी पोलिस ठाण्यात एफआरआय दाखल करण्यासाठी पुढे येत नाही. द्राक्ष सौदा करते वेळी सौंद्याची पावती व्हिडिओ शूटिंग यासह व्यापारी यांची नोंदणी द्राक्ष संघाने घ्यावी असे पोलिस विभाग सांगते. मात्र, द्राक्ष संघ हा प्रत्येक गावोगावांत कसा पोहोचणार, असाही प्रश्‍न निर्माण आहे.

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सातत्याने मागणी करत आहे पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, बाजार समितीने पुढाकार घेऊन मार्ग काढावा.

- चंद्रकांत लांडगे, अध्यक्ष, विज्ञान समिती, राज्य द्राक्ष बागायतदार संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT