Bamboo Processing Agrowon
ताज्या बातम्या

Bamboo Processing : बांबूपासून आता विमानतळे, मेट्रो स्टेशन अन् इमारतींच्या फरशी!

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीमुळे कार्बन उत्सर्जन करणाऱ्या जीवाश्मावर आधारित इंधनाचा वापर थांबविण्याबाबत जगभरात एकमत होत आहे. भारताने २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले असून, पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून बांबूकडे बघितले जात आहे.

केंद्र शासन त्यास आग्रही असून, इथेनॉलसह विमानतळे, मेट्रो स्टेशन आणि इमारतींच्या बांधकामात स्टीलऐवजी बांबूचा वापर करण्याचे प्रमाण वाढले असल्याची माहिती केंद्राच्या बांबू प्रमोशन व प्लांटेशन समितीचे सदस्य, माजी राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार पाशा पटेल यांनी दिली.

खाद्यतेल उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील शिखर संस्था द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (सी) आणि दि ऑल इंडिया कॉटन सीड क्रशर्स असोसिएशन (आयकोस्का) यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित चौथ्या सी-आयकोस्का कॉटन सीड ऑइल कॉन्क्लेव्ह-२०२३ मध्ये श्री. पटेल शनिवारी (ता. ८) बोलत होते. व्यासपीठावर एसईएचे अध्यक्ष अजय झुनझुनवाला, आयकोस्काचे अध्यक्ष संदीप बाजोरिया, बी. व्ही. मेहता, आंतरराष्ट्रीय कृषी व्यापार तज्ज्ञ आणि सेबीचे सदस्य विजय सरदाना, एन. के. प्रोटिन्सच्या प्रियम पटेल, फॉर्च्युनचे एमडी तथा सीईओ अंगशू मलिक, तिरुमला ऑइलचे महादेव दाभाडे आदींची उपस्थिती होती.

श्री. पटेल म्हणाले, की कोणत्याही वनस्पतीच्या तुलनेत बांबूमध्ये कार्बन वायू शोषण्याची क्षमता ३० टक्क्यांनी अधिक आहे. बांबूचे झाड झपाट्याने वाढते. कार्बन माणसाचा शत्रू आहे, तर बांबू कार्बनचा शत्रू. शत्रूचा शत्रू हा आपला मित्र.

इंग्रजांना बांबूचे महत्त्व लक्षात आल्याने त्यांनी बांबूच्या प्रचार आणि प्रसारास मज्जाव करण्यास सुरुवात केली. त्याचा समावेश वृक्ष कायद्यात केल्याने बांबू तोडणे व वाहतूक करण्यावर बंदी आली. २०१४ मध्ये मोदी सरकार येताच ही बंदी उठवून बांबूला गवताचा दर्जा दिला. त्याच्या अधिकाधिक वापरासाठी प्रयत्न सुरू झाले.

वाहनांचे इंजिनही बांबूपासून

इको सिस्टीम फॉर कॉटन सीड ऑइल या सत्रात आंतरराष्ट्रीय कृषी व्यापार तज्ज्ञ आणि सेबीचे सदस्य विजय सरदाना यांनी बांबूच्या विविध उपयोगांवर प्रकाश टाकला. आता वाहनांचे इंजिनही बांबूपासून तयार केले जात असून, यामुळे स्टील, प्लॅस्टिक, रबर यांचा वापर कमी होईल, असे श्री. सरदाना यांनी सांगितले.

इनोव्हेशन अवार्डचे वितरण

परिषदेत अहमदाबादच्या एन. के. प्रोटिन्स यांनी नीलेश पटेल यांच्या स्मरणार्थ ठेवलेला इनोव्हेशन ॲवॉर्ड प्रदान करण्यात आला. अन्न तंत्रज्ञान व कृषी क्षेत्राशी संबंधित देशातील ३५० कॉलेजमधून फूड पाठशाला यांनी पुरस्करांची निवड केली. मनोज कुमार (भारतीय कृषी संशोधन परिषद) कैझर बेग (वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ) यांना वैज्ञानिक गटात तर चेन्नईच्या भावा निषेविधा हिला विद्यार्थी गटात गौरवण्यात आले.

परिषदेचे सूप वाजले

दोनदिवसीय परिषदेत देशभरातून कापूस बी (सरकी) मूल्यसाखळीशी संबंधित ३०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले. यात सरकी तेल आणि पेंड निर्माते, खाद्यतेल रिफायनरी, पॅकर्स, सॉल्वेंट एक्स्ट्रॅक्टर्स, कापूस जिनर्स आणि विक्रेते, ब्रोकर्स आणि सर्व्हेअर्स, शासकीय अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ, सल्लागार आणि मशिनरी निर्माते यांचा समावेश होता.

१५ पेक्षा अधिक सत्रात महत्त्वाची चर्चा झाली. चौथी राष्ट्रीय परिषद ऐतिहासिक ठरल्याचे अजय झुनझुनवाला, संदीप बाजोरिया आणि बी.व्ही.मेहता यांनी सांगितले. विशेष म्हणजे रविवारी सर्व सदस्य ऐतिहासिक वेरूळ लेणी बघण्यासाठी जाणार होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT