Nagpur News : रेशीम धाग्याला पीळ दिल्याशिवाय त्याचा वापर कापड उद्योगात करणे शक्य होत नाही. अशा प्रकारचे युनिट सध्या बंगलोर येथे आहे. परिणामी, धागा तयार झाल्यानंतर या प्रक्रियेसाठी ते बंगलोरला पाठवावे लागत होते. मात्र लवकरच ही सुविधा जालना जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. यातून राज्यातील रेशीम उद्योगाला बळ मिळेल.
रेशीम धागा तयार केल्यानंतर त्याला कापड उद्योगात वापरण्यापूर्वी पीळ (ट्विस्ट) देण्याची प्रक्रिया करावी लागते. त्याशिवाय धागा वापरल्यास तो तुटण्याची भीती राहते. परिणामी, रेशीम धाग्याला पिळ दिलाच जातो. राज्यात रेशीम कोषावर प्रक्रिया करीत त्यापासून धागानिर्मिती करणारे उद्योग आहेत.
मात्र पीळ देण्याकामी लागणारी यंत्रणा असलेला उद्योग नव्हता. परिणामी, राज्यात उत्पादित धागा हा पीळ देण्यासाठी बंगलोर येथे पाठवावा लागत होता. याकामी लागणाऱ्या संयंत्राची किंमत दहा ते पंधरा लाख रुपये असून, रेशीम संचलनालयाच्या वतीने त्यासाठी ७५ टक्के अनुदान दिले जाते.
परंतु हे संयंत्र हाताळणारे कुशल मनुष्यबळ राज्यात उपलब्ध नाही. परिणामी, या संयंत्राच्या खरेदीसाठी कोणीच पुढे येत नव्हते. जालना येथील राजेश टोपे यांनी हे संयंत्र खरेदी केले आहे. परिणामी, आता रेशीम धाग्याला पीळ देण्याचे काम राज्यातच होईल.
धागा उत्पादन झाल्यानंतर त्याला पीळ देणारी यंत्रणा नसल्यामुळे बंगलोर व इतर भागांत धागा पाठवावा लागत होता. यावर अधिकचा खर्च होत होता. पीळ दिल्यानंतर परत धागा राज्यात आणला जात असल्याने हा खर्च वाढतो. आता पीळ देण्यासाठीची यंत्रणादेखील लवकरच उपलब्ध होईल.- महेंद्र ढवळे, उपसंचालक, रेशीम संचालनालय, नागपूर
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.