Akola News : ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने जिल्ह्यात खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. सोयाबीन व इतर पिकांचे उत्पादन आताच ५० टक्के घटणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अद्यापही पाऊस आलेला नसल्याने दररोज नुकसानीचे प्रमाण वाढत आहे.
यामुळे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण ५२ मंडलांमध्ये सर्व्हे करण्याचे निश्चित करीत काम सुरु केले आहे. सुरुवातीला २० मंडलांत हवामानातील प्रतिकूल परिस्थिती लागू होत असल्याने सर्वेक्षणाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
जिल्ह्यात ऑगस्टमध्ये केवळ सरासरीच्या १८ टक्केच पाऊस झाला. पंतप्रधान पीकविमा योजने अंतर्गत २९ ऑगस्टला हवामानातील प्रतिकूल परिस्थितीबाबत जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक झाली.
या बैठकीत ज्या मंडलात ५० टक्के पाऊस कमी झाला, अशा मंडलांमध्ये सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार तालुकास्तरीय संयुक्त समिती गठित करून २० महसूल मंडलांत पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले.
जिल्ह्यात ऑगस्टमध्ये फक्त १७.५ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरित ३२ महसूल मंडलांमध्येही संयुक्त समितीमार्फत सर्वेक्षणाचे निर्देश देण्यात आले आहेत. अहवाल मंगळवार (ता. ५) पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला आहे.
सर्वेक्षणाचे काम सुरु
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर कृषी, महसूल व पंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या संयुक्त समितीमार्फत सर्वेक्षणाचे काम सुरु झाले आहे. यात समितीसोबत विमा कंपनीचाही प्रतिनिधी राहील. रॅण्डम पद्धतीने पीक नुकसानीचा अहवाल तयार केला जाईल. पाऊस कमी झाल्याने सोयाबीन पिकाला फुलोऱ्यात मोठा फटका बसला. कपाशीची सुद्धा वाढ थांबली आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.