Sugarcane Farming Agrowon
ताज्या बातम्या

Pachat Kutti : पुणे जिल्ह्यात ४८ हजार हेक्टरवर ऊस पाचटाची कुट्टी

Sugarcane Harvesting : गेल्या काही वर्षांपासून प्रदूषण कमी करून जमिनीची सुपीकता वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.

Team Agrowon

Pune News : गेल्या काही वर्षांपासून प्रदूषण कमी करून जमिनीची सुपीकता वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून २०२२-२३ या गळीत हंगामात तब्बल ४८ हजार हेक्टरमधील साडे तीन लाख टन उसाचे पाचट कुट्टी करून ती कुजविल्याने जमिनीच्या सुपीकतेत काही प्रमाणात वाढ होण्यास मदत होणार आहे.

त्यामुळे सुमारे ४६ कोटी ५६ लाख रुपयांचा फायदा शेतकऱ्यांना झाला असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

पुणे जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर उसाचे क्षेत्र आहे. ऊसतोडणीला आल्यानंतर दरवर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात साखर कारखाने गळीत हंगाम सुरू करतात. उसाची तोडणी झाल्यानंतर अनेक शेतकरी उसाचे पाचट पेटवून देतात. त्यामुळे हवेचे प्रदूषण वाढून त्याचा परिणाम हवामानावर होतो.

त्यातच पाचट पेटवल्यामुळे उष्णतेमुळे जमिनीतील सूक्ष्म जीवजंतूंचा नाश होत असल्याने जमिनीतील घटकांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होते. त्यामुळे पुढील हंगामात पीक फारसे जोमदार येत नसून उत्पादनात घट येत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे.

कृषी विभागाने मागील पाच ते सहा वर्षांपासून पाचट कुट्टी करून कुजविण्यावर भर दिला आहे. त्याला जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, बारामती, शिरूर, जुन्नर, आंबेगाव अशा सर्वच तालुक्यांतील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

विशेष म्हणजे कृषी विभागाने त्यासाठी तालुकानिहाय कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांनी पाचटाची कुट्टी केल्यानंतर त्याचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचे यावर तज्ज्ञाद्वारे मार्गदर्शन केले गेले. त्याचे फलित म्हणून सेंद्रिय खत एक लाख ९२ हजार टन, नत्र २४०० मे टन, स्फूरद ९६० टन, पालाश ५ हजार २८० टन उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे.

माझ्याकडे एकूण ९५ एकर शेती आहे. त्यापैकी ६० ते ७० एकर शेती उसाखाली आहे. गेल्या काही वर्षांपासून जमिनीची सुपीकता कमी होत असल्याने उत्पादनात घट येऊ लागली होती.

परंतु पुन्हा ती वाढविण्याच्या उद्देशाने शेतात दरवर्षी उसाच्या पाचटाची कुट्टी करतो. त्यामुळे ऊस उत्पादन वाढण्यास मदत होते. मागील पाच ते सहा वर्षांपासून हा प्रयोग करत आहेत.

सध्या शेतामध्ये वरच्या भागात उसाच्या पाचटापासून तयार झालेली माती मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यासाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करत आहेत.

- माउली कापसे, ऊस उत्पादक शेतकरी, वडगाव दरेकर, ता. दौंड

जमिनीची सुपीकता वाढविण्याच्या उद्देशाने राज्य आणि केंद्र शासनामार्फत मागील काही वर्षांत जमीन सुपिकतेचे अभियान राबविण्यात आले होते. त्यामध्ये उसाचे पाचट कुट्टी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या.

आता त्या दरवर्षी घेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये बऱ्यापैकी जनजागृती होत असल्याने शेतकरी स्वतः पाचट कुट्टीकडे वळू लागले आहे. त्यामुळे जमीन सुपिकतेत वाढ होण्यास मदत झाली आहे.

- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. पूर्वी दरवर्षी शेतकरी उसाची तोडणी झाल्यानंतर ऊस पेटवून देत होते. त्यामुळे जमिनीची सुपीकता घटत असल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने आत्मा आणि कृषी विभागांतर्गत कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात अनेक शेतकरी पाचट पेटवून न देता कुट्टी करत असल्याने जमिनीची सुपीकता वाढू लागली आहे.

- महेश रूपनर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, दौंड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers Support: कांद्याच्या भावात घसरण, उपाययोजनांसाठी सरकारकडून समिती गठित

Crop Damage Nashik: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

Fertilizer Overprising: सोलापूर जिल्ह्यातील १९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Assembly Elections 2026: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी ९१.४६ टक्के, तामिळनाडूत ८४.४१ टक्के मतदान

Crop Insurance Hingoli: हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचा ९८ कोटी ७० लाख रुपये पिकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT