Rain News  Agrowon
ताज्या बातम्या

Khandesh Rain News : खानदेशात वादळी पावसाचा तडाखा

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात धुळे, जळगाव व नंदुरबारात रविवारी (ता. ४) अनेक गावांत वादळी पाऊस व हलकी गारपीट झाली. जळगावमधील जळगाव, रावेर, यावल, भडगाव भागात केळी बागांची मोठी हानी झाली आहे.

धुळ्यातही शिरपूर, नंदुरबारात शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागात केळी बागांचे मोठे नुकसान झाले असून, तातडीने पंचनामे व नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. गिरणा नदीच्या पट्ट्यातील भागात पंधरा मिनिटे झालेल्या वादळी पावसाने अक्षरशः होत्याचे नव्हते केले.

जामदा व भऊर शिवारात दहा मिनिटे गारा पडल्या तर जवळपास वीस मिनिटे वादळी पाऊस झाला. ज्यामुळे केळी बागेसह अनेक शेतांमधील पिकांचे नुकसान झाले. अनेक भागात मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने काही ठिकाणी रस्ता बंद झाला होता.

वादळाच्या या तडाख्यात गिरणा परिसरात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

जामदा व भऊर (ता. चाळीसगाव) भागात वादळी पावसाचा जोर तुलनेने अधिक होता. जळगाव, यावल, रावेर भागात काही गावांत गारपीट झाली. जळगाव तालुक्यातील फुपनगरी, कानळदा, पिलखेडा भागात केळी बागांना फटका बसला.

तसेच भडगाव, धरणगाव, अमळनेर, पारोळा या भागातही वादळाने वृक्ष कोसळले. अनेक गावांत घरांची पत्रे उडून नुकसान झाले आहे.

पिंपळी प्र. ज. (ता. अमळनेर) येथील सुंदरबाई तुकडू बाविस्कर (वय ८७) या महिलेच्या अंगावर निंबाच्या झाडाची फांदी पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दगडी सबगव्हाण (ता. पारोळा) येथे जोरदार वादळी पावसात वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

सुनील आबाजी भिल (ठाकरे, वय ३२) असे मृताचे नाव आहे. शेतात असताना लिंबाच्या झाडाच्या खाली आडोशाला उभा राहिला. त्याच झाडावर वीज कोसळल्याने विजेच्या धक्क्याने सुनीलचा जागीच मृत्यू झाला.

शिरपूर तालुक्यात येथे केळी पिकाचे नुकसान

शिरपूर (जि. धुळे) तालुक्यात घोडीसगाव, होळनांथे, तरडी, बभळाज परिसरात वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले. लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे तब्बल एक ते दीड तास चाललेल्या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. केळीच्या बागा उद्‍ध्वस्त झाल्या आहेत. हिसाळे येथे काहींच्या छतावरील पत्रेदेखील उडाले, तर मोठमोठी झाडे उन्मळून पडली.

वाऱ्यामुळे झाडे उन्मळली

धुळ्यातील साक्री, धुळे तालुक्यातही अनेक गावांत नुकसान झाले. पिंपळनेर (ता. साक्री), लामकानी, कापडणे (ता. धुळे) भागात अनेक घरांची पत्रे उडाली व वृक्ष उन्मळून पडले. दोंडाईचा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) व परिसरात जोरदार वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले. पढावद, मुडावद, पाष्टे व इतर भागातही वादळी पाऊस झाला.

नंदुरबारात मोठी हानी

वादळाने घरे, झोपड्या, काही शाळांवरील पत्रे कागदासारखी उडाली. यामुळे अक्कलकुवा, धडगाव तालुक्यांतील वाड्या-पाड्यांवरील ग्रामस्थ उघड्यावर आले. शहादा तालुक्यालाही वादळाचा जोरदार फटका बसला. जवळपास दोन तास वादळी वाऱ्याचा धिंगाणा सुरू होता. तळोदा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी विजेचे खांब वाकले.

तळोदा-चिनोदा रस्त्यावर जोरदार वादळी वाऱ्यामुळे प्रतापपूर (ता. तळोदा) येथील राजेंद्र मराठे यांना जीव गमवावा लागला. ते प्रतापपूरहून आपल्या अर्टिगा गाडीने तळोद्याला येत होते. ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले असून, विजेचे खांबही वाकले आहेत. केळीच्या बागेतील खोड आडवे झाले असून, काढलेली केळीही पावसात सापडल्याने शहादा तालुक्यात मोठी हानी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT