Sharad Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Sharad Pawar : राष्ट्रवादीचा भविष्य काळासाठी आश्वासक चेहरा कोण? मिश्किल हसत उत्तर आलं ‘शरद पवार...'

Team Agrowon

Sharad Pawar Press Conference On Ajit Pawar : अजित पवार यांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुन्हा नव्याने बांधणी करणार असल्याचे शरद पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत वारंवार सांगितलं. पक्षाचे नाव आणि चिन्ह यासाठी न्यायालयीन लढाईच्या भानगडीत पडणार नाही, तर जनतेमध्ये जाऊन त्यांचा पाठिंबा मिळवणं हाच एककलमी कार्यक्रम असेल, असं पवारांनी स्पष्ट केलं.

पवारांचा सगळा भर पुन्हा एकदा नव्याने पक्षाची उभारणी करण्यावर दिसला. या पार्श्वभूमीवर आता पक्षाचा भविष्य काळासाठी आश्वासक चेहरा कोण असेल, असे पत्रकारांनी विचारल्यावर पवारांनी उत्सफुर्तपणे आणि मिश्किल हसत उत्तर दिलं. क्षणाचाही विलंब न करता एक हात वर करत ते म्हणाले ‘शरद पवार...'

अजित पवारांच्या बंडाला आपला पाठिंबा नसून भाजपच्या विरोधात राज्यात आणि देशात आक्रमकपणे मैदानात उतरणार आहे; त्यासाठी आपल्या राजकीय उत्तरआयुष्यातील नवी इनिंग खेळण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंच पवारांनी या उत्तरातून जणू दाखवून दिलं.

पवारांच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या शेजारी त्यांचे नातू आमदार रोहित पवार उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भवितव्य तुमच्या डाव्या हाताला बसलं आहे का, या प्रश्नावर पवार यांनी हे असतील किंवा आणखी कोणी तरूण नेते असतील.

पण या तरूणांच्या साथीने पक्षात नवीन पिढी घडवणार आहे. आज पक्षाचे जे महत्त्वाचे नेते आहेत, जे सोडून गेले आहेत, त्यांच्या राजकीय आयुष्याची सुरूवात आपण कशी करून दिली होती, हे मी माझ्या तोंडून सांगणार नाही. पण मी पुन्हा नेतृत्वाची नवी पिढी उभी करू शकतो, पक्षाची बांधणी करू शकतो.

अशा फाटाफुटीचा आपल्याला अनुभव आहे. राज्यातल्या जनतेवर माझा संपूर्ण विश्वास आहे. जनतेमध्ये जाऊ. त्यांना आमची भूमिका सांगू. मला विश्वास आहे की, जनता आम्हाला पांठिबा देईल, अशा शब्दांत त्यांनी खंबीरपणे आपण आता या लढाईत उतरणार असल्याचं सूचित केलं.

‘‘पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आपला प्रखर विश्वास आहे. सामान्य जनता आणि कार्यकर्ते हीच पक्षाची शक्ती आहे. ज्यांच्याशी संघर्ष केला, विरोध केला त्याच मंडळीबरोबर जाण्याचा निर्णय काही नेते घेत असतील तर कार्यकर्ते अस्वस्थ होणारच. त्यामुळे पुन्हा संघटनेची नव्याने बांधणी करू. मी आणि आमचे तरूण नेतृत्व त्यात यशस्वी होऊ,'' असे पवार म्हणाले.

आज जे काही घडले ती गुगली नव्हती तर दरोडा होता, अशी संभावना पवार यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचे श्रेय पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. पंतप्रधानांनी सिंचन घोटाळा आणि शिखर बॅँकेच्या घोटाळ्याबद्दल काही दिवसांपूर्वी आरोप केले होते. तसेच ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर सुरू आहे. त्याची धास्ती घेऊन सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय या सहकाऱ्यांनी घेतला असावा, असे पवार म्हणाले.

जे गेले त्याची आपल्याला चिंता नाही, पण त्यांच्या पुढच्या राजकीय भवितव्याची मात्र आपल्याला चिंता वाटते; या मंडळींना सत्तेचा फायदा मिळेल परंतु त्यांना लोकांचा पाठिंबा मिळेल असं वाटत नाही, असा टोला पवारांनी मारला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांचे ओझे उतरवण्यासाठी शरद पवार यांनीच ही खेळी केली असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसची एक टीम आज सरकारमध्ये सामील झाली असून दुसरी लवकरच त्या मार्गाने जाईल, असेही ते म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पवारांनी आमच्या बरोबर शिल्लक किती जण आहेत, ते तरी आधी कळू द्या, असे मिश्किल उत्तर दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यात पावसामुळे गाळप हंगाम लांबण्याची शक्यता

Crop Damage Compensation : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड रखडली

Vidhan Sabha Election Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात २१.२४ लाख मतदार

Vidhan Sabha Election Beed : बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात २१ लाखांवर मतदार

SCROLL FOR NEXT