Nashik News खामखेडा, ता. देवळा : नाशिक जिल्ह्यात शेतीच्या प्रत्येक हंगामात संकटांचा डोंगर मात्र हटता हटेना अशी अवस्था आज शेतकऱ्यांची झाली आहे.
कांदा, मेथी, कोबी, वांगी (Vegetable) या पिकांसोबत भाजीपाला पिकांसाठी (Vegetable Crop) शेतकऱ्यांनी केलेला खर्चही शेतीमालातून निघणे कठीण झाल्याने सावकी (ता. देवळा) येथील शेतकरी धनंजय अशोक बोरसे यांनी आपल्या २० गुंठे क्षेत्रावरील वांगी पिकावर बुधवारी (ता. ८) रोटाव्हेटर फिरवला.
श्री. बोरसे यांनी अर्धा एकर क्षेत्रावर तीन महिन्यांपूर्वी वांग्याची लागवड केली होती. महिन्याभरापासून उत्पादन सुरू झाले होते.
मात्र शेतकऱ्यांच्या हातात काहीही येत नसल्याने शेतातील पीक काढण्यापेक्षा आणि खर्च करण्यापेक्षा ते मातीतच घातलेले बरे म्हणून वांगी पिकावर रोटाव्हेटर फिरवला.
काही दिवसांपासून कांदा, वांगे आणि इतर भाजीपाल्याच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी शेतात आलेल्या पिकावर कधी ट्रॅक्टर फिरवतात, कधी उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.
वांगी पिकासाठी वापरण्यात आलेली खते, कीटकनाशके फवारणीचा साधा खर्चही या पिकातून निघणार नसल्यामुळेच बोरसे यांनी हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याच्या पिकावरही ट्रॅक्टर फिरवून कांदा मातीत घातला होता.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.