Sugarcane Harvest
Sugarcane Harvest Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Harvest : तोडणी, वाहतूक खर्चाची कपात एक हजार रुपयांपुढे

टीम ॲग्रोवन

पुणे ः राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी (Sugarcane Farmer) कारखान्यांना ऊस विकल्यानंतर देयकातून तोडणी व वाहतूक खर्च (Harvesting Transportation Cost) कपात केला जातो. गेल्या हंगामात आठ साखर कारखान्यांनी (Sugar Factory) प्रतिटन एक हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम कपात केल्याचे आढळून आले आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी तोडणी व वाहतूक खर्चाची कारखानानिहाय यादी जाहीर केली आहे. ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील कलम दोन व तीनचा आधार घेत केंद्र शासनाकडून उसाला रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) जाहीर केले जातात. अर्थात, कोणताही कारखाना एफआरपीइतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करीत नाही. कारण राज्यभर ऊसतोडणी व वाहतूक खर्च कापून घेत देयक अदा करण्याची प्रथा कारखान्यांनी पाडली आहे.

कारखाने तोडणी व वाहतूक खर्च जास्त लावतात, असा आक्षेप वारंवार शेतकरी घेतात. मात्र त्यावर अद्याप पारदर्शक तोडगा राज्य शासनाला सापडलेला नाही. साखर आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, नवा गाळप हंगाम राज्यभर सुरू झाला आहे. तोडणी व वाहतूक खर्च वाजवी असलेल्याच कारखान्यांची निवड शेतकऱ्यांनी करायला हवी. मागील हंगामात कोणत्या कारखान्याने जास्त खर्च लावला हे शेतकऱ्यांना तपासता येण्यासाठी आयुक्तालयाने खर्चाचे आकडे जाहीर केलेले आहेत.

तोडणी व वाहतुकीच्या नावाखाली राज्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांची लूट करतात, असा जाहीर आरोप बहुतेक शेतकरी संघटनांकडून होत असतो. २०२१-२२ मधील हंगामात साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बिलातून कापलेल्या तोडणी व वाहतुकीच्या रकमा चकित करणाऱ्या आहेत. नाशिक कळवणच्या वसाका कारखान्याला धाराशीव शुगरने भाडेतत्वावर चालविण्यास घेतले आहे.

या कारखान्याने गेल्या हंगामात प्रतिटन ११०९ रुपये इतका सर्वाधिक तोडणी व वाहतूक खर्च कापला आहे. त्याखालोखाल खडकपूर्णा अॅग्रोच्या सिद्धेश्‍वरने (औरंगाबाद) ११०२ रुपये, मानस अॅग्रो (नागपूर) १०९०.६७ रुपये, संत मुक्ताई (जळगाव) १०७४.०६ रुपये, तनपुरे ससाका (नगर) १०२१ रुपये, लक्ष्मी शुगर (सोलापूर) १०१४.२५ रुपये, व्यंकटेश्‍वरा (नागपूर) १००९.६५ रुपये, तर औरंगाबादच्या घृष्णेश्‍वरने १००७.३५ रुपये इतका जबर तोडणी व वाहतूक खर्च लावला आहे.

‘हुतात्मा किसन अहिर’कडून सर्वांत कमी कपात

सर्वाधिक कमी तोडणी व वाहतूक खर्च सांगलीच्या हुतात्मा किसन अहिर ससाकाचा आहे. या कारखान्याने खर्चापोटी प्रतिटन ५७१.६४ रुपये कापलेले आहेत. कोल्हापूरचा भोगावती (५९४.३९ रुपये), नंदुरबारचा द्वारकाधीश (६०१.७३ रुपये), तर कोल्हापूरच्या ‘कुंभी कासारी’ने ६३८.६३ रुपये खर्च लावल्याचे साखर आयुक्तालयाच्या यादीतून स्पष्ट होते आहे.

“ कोणत्याही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाबाबत तोडणी व वाहतूक खर्च जर शेतकऱ्यांना जास्त वाटत असेल, तर संबंधित कारखान्याच्या तोडणी नियोजनानुसार शेतकऱ्यांनी स्वतः मालकतोड करावी. तोडलेला ऊस कारखान्याला गाळपासाठी देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.”
शेखर गायकवाड, साखर आयुक्त

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT