Anandacha Shidha
Anandacha Shidha Agrowon
ताज्या बातम्या

Anandacha Shidha : साडेतीन लाख लाभार्थी ‘आनंदाचा शिधा’पासून दूरच

हेमंत पवार

Karhad News : ज्यांचे हातावर पोट आहे, ज्यांचे कुटुंबच रेशनिंगच्या (Ration Grain) धान्यावर चालते अशा राज्यातील केशरी आणि पात्र शिधापत्रिकाधारक नागरिकांना पाडव्याचा आनंद साजरा करता यावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारच्या वतीने ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) गुढीपाडव्याला देण्याचे जाहीर केले होते. मात्र तांत्रिक अडचणी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गुढीपाडव्याला ‘आनंदाचा शिधा’ मिळालाच नाही.

अजूनही सरकारकडून टप्प्याटप्प्याने साखर, हरभरा डाळ, रवा आणि पामतेल उपलब्ध होण्याची कार्यवाही सुरूच आहे.

त्यामुळे सातारा जिल्ह्यातील तब्बल तीन लाख ८७ हजार ३४१ लाभार्थी पाडव्याच्या आठवड्यानंतरही आनंदाच्या शिध्यापासून दूरच राहिले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे डोळे शिधा कधी मिळणार याकडे लागले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळातील पहिलीच दिवाळी असल्याने त्यांनी सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा केली.

त्याअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना केवळ १०० रुपयांत साखर, हरभरा डाळ आणि रवा प्रत्येकी एक किलो आणि पामतेल एक लिटर देण्याची कार्यवाही सुरू केली.

त्यामुळे सर्वसामान्यांना दिवाळीत चांगला उपयोग झाल्याने त्यांची दिवाळी गोड झाली. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षाचा पहिला मोठा सण असलेल्या गुढीपाडव्यासाठीही ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा केली.

मात्र गुढीपाडवा होऊन गेला तरीही आनंदाच्या शिध्याचे वाटप लाभार्थ्यांना झालेच नाही. अद्याप बहुतांश रेशनच्या दुकानांवर ‘आनंदाचा शिधा’ पोहोचलेला नाही.

त्यामुळे आनंदाचा शिधा घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना रिकाम्या हातानेच परत यावे लागत आहे. राज्यातील १८ लाखांहून अधिक शासकीय तसेच निम शासकीय कर्मचाऱ्यांनी मध्यंतरी बेमुदत काम बंद आंदोलन केले.

त्यामुळे सर्व सरकारी कामे ठप्प झाली होती. त्याचाही फटका या आनंदाच्या शिध्याच्या वाटप यंत्रणेला बसला आहे. अद्याप साखर, रवा, हरभरा डाळ आणि पामतेल या वस्तू जिल्ह्याला उपलब्ध झालेल्या नाहीत.

त्यापैकी साखर आणि रवा उपलब्ध झाला आहे. हरभरा डाळ आणि पामतेल उपलब्ध होण्यासाठी काही अवधी लागणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील तीन लाख ८७ हजार ३४१ लाभार्थी आनंदाच्या शिध्यापासून पाडव्यानंतर आठवड्यानंतरही वंचितच आहेत.

परिणामी ज्यांचा संसार रेशनिंगच्या धान्यावरच आवलंबून आहे, ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांची मोठीच गैरसोय झाली आहे.

पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी

ज्यांचे हातावर पोट आहे, ज्यांचे कुटुंबच रेशनिंगच्या धान्यावर चालते अशा लाभार्थ्यांना शासनाकडून ‘आनंदाचा शिधा’ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यामुळे पाडव्याला आनंदाचा शिधा मिळणार म्हणून संबंधित लाभार्थी आनंदात होते. मात्र शासनाकडून तो शिधा पाडव्याला न मिळाल्याने त्यांच्या आनंदावर विरझणच पडले.

पाडव्यानंतर आठवडा होत आला तरीही शिधा मिळालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना शिधा कधी मिळायचा त्या वेळी मिळू दे फक्त सध्या रेशनिंग देण्याची सोय करावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.

शासनाकडून साखर, हरभरा डाळ, रवा हे प्रत्येकी एक किलो आणि पामतेल एक लीटर प्रत्येक लाभार्थ्याला देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सातारा जिल्ह्यातील तीन लाख ८७ हजार ३४१ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. सर्व वस्तू उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वाटप सुरू होईल. त्यासाठीची कार्यवाही सध्या सुरू आहे.
- अमर रसाळ, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT