Maratha Reservation
Maratha Reservation Agrowon
ताज्या बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षण बैठक गोंधळात गुंडाळली

टीम ॲग्रोवन

मुंबई : मराठा आरक्षणासाठी बोलविण्यात आलेली बैठक (Maratha Reservation Meeting) गुरुवारी (ता. २५) रात्री ठोस निर्णयाविना गोंधळात गुंडाळली. ५० टक्क्यांच्या आत आरक्षणाची मागणी (Demand For Reservation) करणाऱ्या कार्यकर्त्यांना बोलू न दिल्याने आणि सारथीमध्ये (SARTHI) कुणबी विद्यार्थ्यांच्या समावेशावरून कार्यकर्त्यांत जोरदार चकमकी झाल्या. अखेर संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी घाईगडबडीने आभार मानत ही बैठक गुंडाळली.

दरम्यान, कोल्हापूरच्या दिलीप पाटील यांनी सारथी संस्थेच्या लाभार्थ्यांमधून कुणबी समाजाला वगळावे, अशी केलेली मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली. तसेच विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षणांतर्गत निवड झालेल्या एक हजार ६४ उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. साधारणपणे २ हजार, १८५ उमेदवार मराठा आरक्षण घेऊन शासन सेवेत रुजू होणार आहेत. यापैकी ४१९ उमेदवार शासन सेवेत रुजू झाले आहेत. तर १ हजार ६४ उमेदवारांना विविध विभागांमध्ये रुजू करून घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या वेळी नियुक्त्यांसह अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी या संस्थांना अधिक सक्षम करण्यात येणार असून, येत्या काळात स्थापन करण्यात येणारी उपसमिती आरक्षण संदर्भातील सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील. तसेच सारथी या संस्थेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादनमंत्री शंभूराजे देसाई, विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार अर्जुन खोतकर, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, माजी आमदार नरेंद्र पाटील, मराठा मोर्चाचे आबासाहेब पाटील, मराठा आरक्षण कार्यकर्ते विनोद पाटील यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, आरक्षणासाठी काम करणाऱ्या संघटना, मराठा समन्वयक उपस्थित होते.

‘सारथी’तून कुणबी वगळा

कुणबी समाजाला ओबीसीमधून आरक्षण आहे, त्यामुळे सारथी संस्थेच्या योजनांमधून कुणबी समाजाला वगळले पाहिजे, अशी मागणी कोल्हापूरच्या दिलीप पाटील यांनी केली. याला मराठा महासंघाच्या राजेंद्र कोंढरे यांनी आक्षेप घेतला. त्यावरून या दोघांत मोठा वाद झाला. या वादाकडे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाहत राहणे पसंत केले. योगेश केदार या कार्यकर्त्याने ओबीसी आरक्षणांतर्गत मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी मागणी लावून धरली. केदार याने गोंधळ घातल्याने मंत्री भुसे यांनी त्याला आपल्या जागेवर नेऊन बसवत शांत केले.

संभाजीराजेंवर कोणते आरोप झाले...

बैठकीची सूत्रे संभाजीराजे यांनी स्वत:कडे ठेवली होती तसेच त्यांच्या स्वराज्य संघटनेचे काही पदाधिकारीही कोणाला बोलू देत नव्हते. बैठकीत कोणी काही बोलले तर त्यांना निघून जाण्याची धमकी दिली जात होती, असा आरोप केला. अन्य समन्वयकांना संभाजीराजे यांनी बोलूच दिले नाही, असाही आरोप केला.

ओबीसीमधूनच आरक्षण हवे

मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावून अन्य विषयांवर चर्चा करू नका, असे सांगत काही समन्वयकांनी ओबीसी आरक्षणातूनच मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी लावून धरली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT