येवला, जि. नाशिक : येवला शहर व तालुक्यातून अनेक शेतकरी स्वतःच्या वाहनाने तसेच काही वाहनधारक शेतकऱ्यांचा शेतीमाल (Agriculture Produce) घेऊन कोपरगाव, शिर्डी, नगरकडे जातात; मात्र, त्यांना मनमाड-नगर राज्य महामार्गावरील येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर (Toll Plaza) टोलचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोल माफी देण्यात यावी, अशी मागणी तालुका प्रहार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
याबाबत टोल प्रशासनाचे अधिकारी शंकर कदम, इस्माईल शहा यांना गुरुवारी (ता. १) निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यासह बहतेक ठिकाणी स्थानिकांना टोल आकारणीतून वगळण्यात येत असून मनमाड-नगर राज्य महामार्गावरील येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर मात्र सर्रास टोलवसुली करण्यात येत आहे.
तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी भाजीपाल्याची पिके घेतात. किंबहुना, येवला तालुक्यात कांद्याचे पीक घेतले जात असून नगर, राहाता या बाजारपेठेतही येथील कांदा विक्रीला जातो. त्यामुळे विक्री करताना शेतकऱ्यांची आर्थिक खर्चाची बाजू कमी करण्यासाठी ही मागणी करण्यात येत आहे.
प्रहार स्टाइलने आंदोलनाचा इशारा
सर्व शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोल माफी मिळावी अन्यथा प्रहार स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा या वेळी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, अमोल फरताळे, सुनील पाचपुते,क्ष रामभाऊ नाईकवाडे आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.