Agriculture Electricity | Agriculture | Power Connection Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : एक लाख पाच हजार वीजजोडण्या देण्याचा निर्धार

राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या लवकर देण्याचे आदेश दिले आहेत.

टीम ॲग्रोवन

Nanded: ‘‘महावितरण (Mahavitaran) ही सेवा देणारी कंपनी आहे. त्यानुसार सकारात्मक दृष्टिकोन ठेवत कोटेशनची रक्कम भरून प्रलंबित असलेल्या एक लाख पाच हजार २२५ कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या (Power Connection) येत्या मार्च २०२३ पर्यंत देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी युद्धपातळीवर कार्यवाही करावी,’’ असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये शुक्रवारी (ता. ९) आयोजित बैठकीत नांदेड व लातूर परिमंडळांतर्गत येणाऱ्या नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, व बीड जिल्ह्यांतील कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्यांचा तसेच नादुरुस्त रोहित्र बदलण्याच्या कामांचा ताकसांडे यांनी आढावा घेतला.

या बैठकीस नांदेड परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता सुधाकर जाधव, लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता मदन सांगळे, परभणीचे शांतिलाल चौधरी, उस्मानाबाद मंडळाचे श्रीकांत पाटील, बीड मंडळाचे प्रभारी निकम, स्थापत्य विभागाचे अधीक्षक अभियंता मोहन काळोगे उपस्थित होते.

ताकसांडे म्हणाले, ‘‘राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या लवकर देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पैसे भरून प्रलंबित असलेल्या एकूण एक लाख ८० हजार १०६ कृषिपंपांना येत्या मार्च २०२३ पर्यंत नवीन वीजजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे.

त्यापैकी नोव्हेंबरमध्ये ७५ हजार नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या. तर उर्वरित एक लाख पाच हजार २२५ वीजजोडण्या येत्या मार्चपर्यंत देण्याचे नियोजन आहे. नोव्हेंबर महिन्यात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक २० हजार २५० कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तर या महिन्यापासून मार्च २०२३ पर्यंत दरमहा ३० हजारांपेक्षा अधिक वीजजोडण्या द्या.’’

‘‘क्षेत्रीय कार्यालयांनी स्थानिक पातळीवर कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याची तातडीने कार्यवाही करावी. यामध्ये कोणत्याही प्रकारचा कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक विभागाने दिलेल्या वीजजोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अन्यथा दंडात्मक करावाईस सामोरे जाण्याची तयारी ठेवावी,’’ असा इशारा ताकसांडे यांनी दिला.

‘नादुरुस्त रोहित्रे तत्काळ बदला’

‘‘सर्वत्र शेतीचा रब्बी हंगाम सुरु आहे. विजेची मागणी वाढली असल्याने त्यामुळे शेतकऱ्‍यांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी ‘महावितरण’ने नियोजन केले आहे. जळालेले किंवा नादुरुस्त झालेले रोहित्र तत्काळ बदलण्याची कार्यवाही करावी. नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी अतिरिक्त स्वरूपात रोहित्र तयार ठेवावेत. मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना मुबलक प्रमाणात ऑइलचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे या रब्बी हंगामात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी विशेष काळजी घ्यावी,’’ असे निर्देश संजय ताकसांडे यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Management: ढगाळ हवामानात रब्बी पिकांची काळजी कशी घ्यावी?

Rabi Crop Area: रब्बी पीक क्षेत्रात १८.२४ लाख हेक्टरनं वाढ, कडधान्यांत हरभरा सर्वाधिक

Farm Equipment Theft: रोटाव्हेटर चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत

Local Body Elections: युती, आघाडी अन् स्वतंत्र लढाईमुळे मतदारराजा गोंधळला

Agriculture Festival: अहिल्यानगरमध्ये शेतकरी, महिलांसाठी कृषिपर्व महोत्सव

SCROLL FOR NEXT