Paddy Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Crop Damage : रत्नागिरीत ७८ हेक्टर भातशेतीची हानी

Team Agrowon

Rtnagiri News : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून श्रावणधारा बरसत आहेत. मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी किनारी परिसरातील ७८ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले.

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. चार दिवस पुराचे पाणी शेतामध्ये साचून राहिल्यामुळे हे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

जून, जुलै या दोन्ही महिन्यांची सरासरी गाठणे मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शक्य झाले. जिल्ह्यात आजपर्यंत २१०६ मिमी सरासरी पाऊस झाला असून गतवर्षीच्या तुलनेत चारशे मिमी कमी पाऊस झाला.

जूनमध्ये हे चित्र उलटे होते. पाचशे मिमी कमी पाऊस पडला होता. जुलैमध्ये ही कमी भरून काढून त्यापेक्षा अधिक नोंद झाली आहे. जिल्ह्यात मॉन्सून हंगामात सरासरी ३३०० मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत ७० टक्के पाऊस झाला. पावसामुळे भातलावण्यांची कामेही अखेरच्या टप्प्यात आहेत.

मागील आठवड्यात मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, बावनदी, अर्जुना, कोदवली, काजळी या नद्यांना आलेल्या पुरामुळे किनारी भागातील परिसर जलमय झाला. किनारी भागातील भातशेतीला पुराचा फटका बसला. चार दिवसांहून अधिक काळ पाणी शेतामध्ये साचून राहिल्याने लावलेली भात रोप कुजली असून काही ठिकाणी गाळ साचून राहिला आहे.

पावसाने सलग तिसऱ्या दिवशी विश्रांती घेतल्यामुळे पूर ओसरला असून परिस्थितीही नियंत्रणात आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यास आरंभ केला आहे. जिल्हा कृषी विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात ७७.६६ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यात रत्नागिरी २५.३५ हेक्टर, खेड १४.९०, लांजा ०.०३, राजापूर ०.५८, मंडणगड ४.४७, चिपळूण ३०.९३, दापोली ०.०९ हेक्टरचा समावेश आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असून सलग तीन दिवस सूर्यदर्शन झाले. रविवारी (ता. ३०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी १९.०८ मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगडमध्ये २७.५० मिमी, दापोली १३.७०, खेड २१.२०, गुहागर १४.२०, चिपळूण १६, संगमेश्‍वर २४.२०, रत्नागिरी १३.८०, लांजा १९, राजापुरात २१.८० मिमी नोंद झाली. हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

चारपेक्षा जास्त दिवस भात शेतीमध्ये पाणी साचून राहणे, नदीकाठची भात शेती वाहून जाणे, शेतीमध्ये गाळ साचून नुकसान झाल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे. त्यानुसार पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT