Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अतिवृष्टीनं शेतकऱ्यांची स्वप्नं मातीत काळवंडली

Raj Chougule

कोल्हापूर :

‘का रं पावसा असा

कहर अवेळी मांडला?

शेतकरी राजा माजा

पार ओरबाडूनी गेला !

ग्याल सारं पीकपाणी

स्वप्न पण विखुरली,

घामाची, कष्टाची त्याज्या

झोळी पण रीती झाली!’

अगदी या कवितेतील या ओळींप्रमाणे शेतकऱ्यांचा काळ बनून आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची अतोनात हानी केली आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्याला उत्पन्नाचे स्वप्न दाखवणारी शिवारे आता मलूल झाली आहेत.

पिकांवर नजर टाकली असता जणू ती शेवटची घटका मोजताहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यात भविष्यातील चिंतेचे ढग दाटून आले आहेत. चांगलं पीक हाती येण्याची शेतकऱ्यांची स्वप्नं सलग दोन दिवसांच्या अतिवृष्टीनं (Heavy Rainfall) मातीत काळवंडली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याला परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या परिस्थितीत शुक्रवारी (ता.१४) शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन संवाद साधला. पूर्वी कधीही पाण्याखाली न गेलेली शिवारे यंदाच्या पावसाने पाण्याखाली आहेत. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढला आहे. अजूनही पंचनाम्याचे आदेश नाहीत. यामुळे केवळ सर्वेवरच नुकसानीचा नजर अंदाज कृषी विभागाकडून दिला जात आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागातील अगदी सामान्य पावसाचा हातकणंगले तालुक्यातील आळते परिसर. २४ तासांत दहा ते पंधरा मिलिमीटर पाऊस म्हणजे या भागासाठी अत्यंत समाधान देणारा. पण ११ व १२ ऑक्टोबर या सलग दोन दिवशी ७० ते ८० मिलिमीटर पावसाने या परिसराला झोडपून काढले. त्यामुळे कापणीसाठी आलेल्या खरीप पिकांची वाताहत झाली.

पाण्याचे लोंढेच्या लोंढे शेतातून वाहू लागले. आणि त्यातच खरीप पिकाच्या उत्पन्नाचे स्वप्न पाहणाऱ्या डोळ्यातील अश्रू मिसळून गेले. आता पाऊस थांबला, पण शेतीची झालेली तळी नुकसानीचे विदारक वास्तव समोर आणतायेत. कोण शेतीचे पाणी बाहेर काढतोय, तर तर कोण शेतीत किती पाणी आहे, हे पाहून हिरमूसला गेला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावे अद्यापही पाण्यासाठी तहानलेली आहेत. हातकणंगले तालुक्याचा सुमारे १५ ते १६ हजार लोकसंख्या असणारा आळते गावाचा परिसरही याच पट्ट्यातील. कमी पाण्यात ही ऊस भाजीपाला, खरीप पिके याबरोबरच सेंद्रिय शेती ही या गावात केली जाते. साधारणतः कमी पावसाचा भाग असेच या गावचे वर्णन करता येईल.

पण या गावाचा दौरा करताना शुक्रवारी मात्र विपरीत चित्र दिसले. शेतीचे बांध फोडून रस्त्यावरून इतस्थ वाहणारे पाणी, वाहून आलेला कचरा, मदतीची याचना करणारी साचलेल्या पाण्यातली पिके असेच चित्र गावोगावी आहे.

महावीर हावळे हे पट्टीचे शेतकरी. पाऊस पडून गेला आणि त्यांनी मुलाच्या साहाय्याने शेतीचे सर्व बांध मोकळे करून सोयाबीनमध्ये भरलेले पाणी ओढ्याला सोडले. गुडघाभर राडीत हे काम केले. यामुळे सोयाबीनचे उत्पादन थोडे तरी येईल, असा आशावाद त्यांचा आहे. पण ज्यांना असे करणे जमले नाही त्यांचे सोयाबीन मात्र कुजण्याच्या अवस्थेत आहे. त्याचा सुटणारा दर्प नुकसानीच्या धोक्याची जाणीव करून देत आहे. ज्याचे क्षेत्र कमी आहे, त्यांनी तर उत्पन्नाच्या आशाच सोडल्या आहेत.

अमोल चौगुले यांनी याच वातावरणात सोयाबीनची मळणी केली. पण ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपया’ असाच काहीसा अनुभव त्यांना सोयाबीन पिकातून आला. जादा ओलाव्यामुळे सोयाबीन कवडीमोल भावात विकला गेला. रोजच्या पावसामुळे सोयाबीन वाळवणे ही शक्य झाले नाही. यामुळे सोयाबीनचे पीक तोट्यात गेले, असे सांगत त्यांनी नुकसानीचे वर्णन केले.

ज्या शेतकऱ्यांनी उशिरा सोयाबीन पीक लागवड केली. जादा

कालावधीच्या जाती निवडल्या, त्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

- संगीता तराळ, कृषी सहाय्यक

हाता तोंडात आलेला सोयाबीनचा घास दोन दिवसांच्या पावसाने अक्षरशः काढून घेतला. दरवर्षी दीड एकर सोयाबीन असतो. यातून पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन निघते. आता मात्र निम्मेच उत्पन्न निघेल.

- संकेत पाटील, युवा शेतकरी.

हातकणंगले तालुक्यात वडगाव व हातकणंगले विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जाणे शक्य नसल्याने नजर अंदाजावरून सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे. अजूनही पंचनाम्याचे आदेश आलेले नाहीत.

- अभिजित गडदे, तालुका कृषी अधिकारी.

पंचनामे करायचे कोणी ?

दोन दिवस झाले तरीही अजून कोणत्याच स्तरावरून पंचनाम्याचे आदेश आलेले नाहीत. पंचनामे करताना महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. इतका पाऊस व नुकसान होऊन ही अजूनही कुठेच पंचनाम्याबाबत गांभीर्य नसल्याने शेतकऱ्यात नाराजी आहे. केवळ कृषी विभागावर पंचनाम्याचा भार टाकू नये, असा सूर कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांतून आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT