jalyukt shivar yojana : राज्यभरात पाणीटंचाई संपवण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणून ज्याकडे आशेने पाहिले जाते त्या जलयुक्त शिवार अभियानाला सुरुवात झाली आहे. या योजनेतून गावाच्या शिवारात साखळी बंधारे, सिमेंट बंधारे, मातीनाला बांध यांची दुरुस्ती कामे या अभियानाअंतर्गत करण्याची योजना आखली आहे. मागील वेळीसारखे भ्रष्टाचाराचे आरोप होऊ नयेत म्हणून हे काम करण्याची सामाजिक संस्थांच्या खांद्यावर दिली आहेत. पण ही कामे करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा निधीच नसल्याने कामे तरी कशी सुरू करायची हा प्रश्न अनेक संस्थांसमोर आहे.
राज्यात वेळोवेळी पडलेल्या दुष्काळाचा विचार करून, आणि त्यावर कायम स्वरूपी शाश्वत उपाय सुचविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आली. शिंदे-फडणवीस सरकारने या योजनेच्या टप्पा दोनची नुकतीच घोषणा केली. या अभियानाअंतर्गत कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेशही शासनस्तरावरून धडकले, परंतु प्रत्यक्षात मात्र उलटच घडले. जूनचा पहिला आठवड्यातही पाऊस न पडल्याने जलसंधारणाची कामे धडाक्यात पूर्ण करण्यासारखी परिस्थिती असतानाही कामांना सुरुवातच झाली नाही.
जलयुक्त शिवारच्या कामात पारदर्शकता आणि गुणवत्ता असावी. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून तालुकानिहाय एका सामाजिक संस्थेची नेमणूक केली आहे. ही संस्था तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये काम करणार आहे. यासाठी संबंधित गावाने ग्राम समितीबरोबर शिवार फेरी करून त्यानुसार प्राथमिक आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याला जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानंतर ते काम सामाजिक संस्थांनी करायचे आहे.
अनेक ठिकाणी अजूनही आराखडे तयार झाले नाही. तसेच काही ठिकाणी संस्थांची नेमणूकच झाली नाही. त्यामुळे कामांना सुरुवात झाली नाही. जर संस्थांची नियुक्ती झाली असली तरी निधीचा प्रश्न गंभीर आहे. या अभियानात शेततळे, नाला उपचार, दुरुस्ती, गळमुक्त धरण, पूर्वीची अपूर्ण कामे आदी कामांचा समावेश करू शकतो. या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते. तेवढा निधी सामाजिक संस्थांकडे नाही. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाचे काम संबंधित संस्थांनी पूर्ण झाल्यानंतरच संबंधितांना निधी देण्यात येईल. असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
प्रशासकीय पातळीवर नियोजनांमध्ये संभ्रम असलेल्या जलयुक्त शिवार २.० अभियानातून पाण्याचे योग्य व्यवस्थापन व वापरासाठी किती उपयुक्त ठरेल याबाबत शंका निर्माण होत आहे.
सामाजिक संस्था या काही ठेकेदार नाही. एखाद्या तालुक्यात ३०-४० गावांमध्ये एका वेळी काम सुरू करायचे असल्यास जर संस्थांकडे निधी उपलब्ध नसेल. त्यामुळे जलयुक्तची कामे निधीअभावी बंद ठेवावी लागतील.बाळासाहेब शिंदे, पाणी चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.