Mumbai News : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या नोटिशीवरून विधान परिषदेत सलग दुसऱ्या दिवशी गोंधळ झाला. त्यांच्याविरोधात अपात्रतेची कार्यवाही सुरू असताना त्या पदावर राहू शकत नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला. तर संविधानिक तरतुदीनुसार त्यांच्या उपसभापतिपदावर कोणताही परिणाम होणार नाही, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
गोऱ्हे यांच्याविरोधात आणलेल्या अपात्रतेच्या नोटिशीवरील एक तासाच्या विशेष चर्चेदरम्यान विरोधकांनी गोऱ्हे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कायद्यातील तरतुदींवर बोट ठेवले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे नेते अनिल परब, ‘राष्ट्रवादी’चे शशिकांत शिंदे, ‘शेकाप’चे जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.
दरम्यान या चर्चेला आक्षेप घेत भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी अशी चर्चा होतेच कशी, असा सवाल केला. यावर प्रचंड गोंधळ झाला. या वेळी तालिकाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी गटनेत्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर एक तासाची चर्चा ठरली आहे. त्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली.
मंगळवारी (ता. १८) दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच ‘शेकाप’च्या जयंत पाटील यांनी सोमवारचा मुद्दा पुन्हा उपस्थित करत गोऱ्हे यांच्या पक्षांतरावरून चर्चेची मागणी केली. त्या वेळी गोऱ्हे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. जयंत पाटील यांचा पहिलाच प्रश्न असूनही त्यांनी चर्चेची मागणी लावून धरली.
दरम्यान पाटील हे प्रश्न विचारत नसल्याने गोऱ्हे यांनी मनीषा कायंदे यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली. त्यामुळे गोंधळ झाला. विरोधक आक्रमक झाल्यानंतर संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हस्तक्षेप करत, मुळात हा सभागृहाचा विषयच नाही.
तरीही यावर एक तासांची चर्चा घेऊया, उपसभापतिंविरोधातील चर्चा असल्याने ती त्यांच्यासमोर होणे अपेक्षित नाही. त्यामुळे तालिकाअध्यक्ष आसनावर नियुक्त करावे. त्यानंतर निर्णय घ्या, अशी विनंती केली. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास मार्गी लागला.
विधान परिषदेत घटनात्मक पेच
सध्या घटनात्मक पेच निर्माण झाला असून विधान परिषदेच्या उपसभापतीच पक्षांतर करतात हे देशाच्या इतिहासात प्रथमच घडत आहे, असा आरोप काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी केला.
ते म्हणाले, त्या शिवसेनेतच होत्या तर पक्षांतर का केले, त्यांनी पत्रात तसे म्हटले आहे, शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही ट्विट करून पक्षात स्वागत कसे करतात, त्या जोवर पदावर आहेत तोवर येथील चर्चा कायदेशीर होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या अपात्रतेचा निर्णय जोवर होत नाही तोवर त्यांना बाजूला करून ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती करावी, अशी मागणी केली.
कामकाजावर परिणाम होत नाही : फडणवीस
फडणवीस यांनी मंगळवारी (ता. १८) या संदर्भात कायदेशीर बाजू मांडत भूमिका स्पष्ट केली. सदस्य म्हणून अपात्र ठरवणे आणि उपसभापतिपदावरून दूर करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अपात्र ठरवणे हे सभागृहाच्या अखत्यारित येत नाही, असे चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘अपात्रतेच्या प्रक्रियेचा कोणताही परिणाम सभागृहाच्या कामकाजावर होत नाही.
जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत सगळे अधिकार उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे यांना आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. संविधानाच्या दहाव्या अनुसूचीमध्ये सभापती किंवा उपसभापतींनी त्यांच्या राजकीय पक्षाचा राजीनामा देणे किंवा पक्षाचे सदस्यत्व घेणे यासंदर्भात सूट देण्यात आली आहे.
अन्य सदस्यांचे अधिकार हे सभापती किंवा उपसभापतींना लागू नाहीत. गोऱ्हे यांनी मुळात पक्षांतरच केलेले नाही, विधिमंडळाच्या सदस्य होताना त्या ज्या पक्षात होत्या त्याच पक्षात त्या आहेत, केवळ त्या पक्षाचे नेतृत्व बदललेले आहे.’
‘निलंबन करायला भाग पाडू नका’
प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेच्या नोटिशीवरील चर्चेवेळी तालिकाअध्यक्ष म्हणून निरंजन डावकरे आसनावर येत होते. त्या वेळी काही सदस्य खाली बसून मोठ्याने बोलत होते. विरोधी आणि सत्ताधारी सदस्य एकमेकांवर टीका करत असताना खाली बसून बोलू नका, मला निलंबनासारखी कारवाई करायला भाग पाडू नका, असा इशारा गोऱ्हे यांनी दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.