
डॉ. आनंद गोरे, डॉ.वासुदेव नारखेडे, डॉ.मदन पेंडके
Kharif Season : सुरवातीच्या पीकवाढीच्या अवस्थेत तसेच संवेदनशील अवस्थेत पाणी देण्याची व्यवस्था करावी. हलकी कोळपणी, आच्छादनाचा वापर, तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर, एक आड एक सरीवाटे संरक्षित सिंचनाचा अवलंब करावा.
यावर्षी पावसाला उशिरा सुरवात झाली. तसेच वितरणातही तफावत दिसून येत आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून जुलै महिन्यात चांगल्या पावसानंतर पेरण्या झाल्या. यामध्ये जुलै महिन्यात दोन टप्यात पेरण्या झाल्या. परंतु आता बहुतेक ठिकाणी दहा ते पंधरा दिवसापासून पावसाचा खंड दिसून येत आहे.
यामुळे यामध्ये मुख्यत्वे हलक्या कोळपण्या करणे आवश्यक आहे. यामुळे जमिनीला पडलेल्या भेगा बुजतात, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे शक्य होते. खुरपणी आणि कोळपणीव्दारे तण नियंत्रण करणे आवश्यक आहे. जमिनीतील ओलावा व अन्नद्रव्य यासाठी तणे पिकांना स्पर्धा निर्माण करतात. यासाठी तण नियंत्रण करणे गरजेचे आहे.
जमिनीतील ओलावा नसल्याने पिकांना फवारणीव्दारे अन्नद्रव्य द्यावेत. पोटॅशिअमच्या फवारणीमुळे पर्णरंध्रातून उडून जाणारे पाणी कमी करणे शक्य आहे. यामुळे पीक पाण्याचा ताण सहन करू शकते. तसेच हलकी कोळपणी, आच्छादनाचा वापर, तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर, एक आड एक सरीवाटे संरक्षित सिंचनाचा अवलंब करावा.
कोरडवाहू शेतीसाठी उपाय योजना:
ज्या ठिकाणी पेरणी झालेली आहे परंतु पावसाचा खंड आहे अशा ठिकाणची उपाययोजना ः
१) संरक्षित सिंचन : तुषार सिंचन, ठिबक सिंचन, मडका सिंचन, एक आड एक सरी वाटे संरक्षित सिंचनाचा अवलंब करावा. सुरवातीच्या पीकवाढीच्या अवस्थेत तसेच संवेदनशील अवस्थेत पाणी देण्याची व्यवस्था करावी. उदा. पीक वाढीची अवस्था, फुलोरा व दाणे भरण्याची व पोसण्याची अवस्था या अवस्थेत पिकांना पाणी द्यावे.
२) आच्छादनाचा वापर ः बऱ्याच वेळा सुरवातीस पावसाच्या आगमनानंतर पावसाचे एक ते दोन खंड विशेष करून जुलै - ऑगस्ट महिन्यात आढळून येतात. अशावेळी जमिनीतील ओलावा कमी होऊन पिकांना पाण्याचा ताण बसतो. यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. (उदा. सुबाभूळ, गिरीपुष्पाचा पाला, सोयाबीन, भात, काड/भुसा, मातीची भर इत्यादी)
३) हलकी कोळपणी ः पीक २१ दिवसांचे झाले असल्यास परिस्थितीनुसार हलकी कोळपणी करावी, मातीची भर द्यावी. पावसाचा खंड आढळून आल्यास पिकांच्या अवस्थेनुसार वरचेवर हलक्या कोळपण्या करून जमिनीच्या भेगा बुजविण्यात याव्यात. यामुळे ओलावा टिकवून ठेवता येतो व जमिनीतील ओलावा उडून जाण्याचे प्रमाण कमी होते.
४) तण नियंत्रण ः वेळेवर तण नियंत्रण करावे. आंतर मशागतीमध्ये वाढीच्या अवस्थेनुसार पाळी मारून वेळेवर खुरपणी,कोळपणी करून तण नियंत्रण करणे गरजेचे आहे जेणेकरून तणांमुळे पिकांना अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश, जागा इत्यादीसाठी स्पर्धा निर्माण होणार नाही. आंतर मशागतीमध्ये पिकांच्या पिकांना मातीची भर दिल्यास ओलावा टिकून राहतो, हवा खेळती राहते, तणांचे नियंत्रण होते, पिकांना वाढीसाठी फायदा होतो.
५) जमिनीतील ओलावा कमी झाला असल्यास पिके पाण्याच्या कमतरतेची लक्षणे दाखवत असल्यास साध्या पाण्याची फवारणी करावी
६) जमिनीतील ओलावा नसल्याने पिकांना फवारणीव्दारे अन्नद्रव्य द्यावे. अशावेळी पिकांना फवारणीतून अन्नद्रव्ये देता येतील. ओलावा कमी असल्यास किंवा इतर परिस्थितीमुळे पिकांची वाढ समाधानकारक नसल्यास पिके ३० दिवसांच्या आत असल्यास पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) ०.५ टक्के (५० ग्रॅम दहा लिटर पाणी) , ३० ते ६० दिवसाच्या पिकांवर पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) १ टक्के (१०० ग्रॅम दहा लिटर पाणी) आणि ६० दिवसाच्या पुढे पावाचा खंड आल्यास पोटॅशियम नायट्रेट
(१३:००:४५) २ टक्के (२०० ग्रॅम दहा लिटर पाणी) फवारावे.
७) केओलीन या बाष्परोधकाची ६ ते ७ टक्के फवारणी करावी.
८) फळबागासाठी बोडोपेस्टचा वापर करावा.
९) फळझाडांमध्ये आच्छादनाचा वापर करावा. वाळलेले गवत, सोयाबीन भुसा, भात भुसा किंवा गिरीपुष्प किंवा सुबाभूळ पाला आच्छादनासाठी वापरावा.
१०) वेळेवर तण, कीड व रोग व्यवस्थापन यावर भर द्यावा. पावसाच्या खंड काळात रस शोषण करणाऱ्या किडी, खोड किडी, चक्री भुंगा, नागआळी अशा किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी योग्य ते सर्वेक्षण व कीड नियंत्रण उपाययोजना करावी.
११) सततचे ढगाळ हवामान असल्यास रोगाचा प्रादुर्भाव ओळखून बुरशीनाशकाची फवारणी करावी.
ठराविक अंतरावर सऱ्या ः
-कपाशी, तूर सारख्या पिकांमध्ये एक किंवा दोन ओळीनंतर, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन, सारख्या कमी अंतरावरील पिकामध्ये प्रत्येक ४ ते ६ ओळीनंतर सुरवातीची खुरपणी,कोळपणी झाल्यानंतर ३० ते ३५ दिवसांनी बळिराम नांगराने सऱ्या पाडाव्यात (१५ सेंमी खोल). यामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी मुरण्यास व त्याचा लाभ पिकाला पुढील कालावधीसाठी किंवा पुढील रब्बी पिकासाठी होतो. अधिक पाऊस झाल्यास अतिरिक्त पाणी सरी वाटे सुरक्षितपणे शेताबाहेर काढून देता येते.
सरी वरंबा व बंदीस्त सरीचा उपयोग:
- हलक्या व मध्यम उताराच्या जमिनीवर ही पध्दत उपयुक्त ठरते. बळिराम किंवा सरीच्या नांगराने अथवा कोळप्याच्या साहाय्याने पेरणीपूर्वी पिकानुसार ५० ते ६० सेंमी अंतरावर सरी वरंबा तयार करून वरंब्यावर पेरणी करावी.
- कोरडवाहू शेतीमध्ये आंतर मशागतीची सुरवातीची कामे झाल्यानंतर सरी वरंबे तयार करून उताराच्या जमिनीमध्ये सरीच्या लांबीवर ५ ते ७ मीटर अंतरावर सऱ्यामध्ये आडवे वरंबे तयार केल्यास सरीमध्ये जमा झालेले पाणी उताराच्या दिशेने न वाहता जमिनीत तेथेच मुरण्यास मदत होते.
संपर्क: डॉ. आनंद गोरे, ९५८८६४८२४२
(अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.