
Mango Orchard : आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असून शेवटच्या टप्प्यातील आंब्याची काढणी सुरु आहे. काढणीस तयार आंबा फळांची काढणी देठासह झेल्याच्या सहाय्याने चौदा आणे म्हणजेच ८० ते ८५ टक्के पक्वतेला करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने फळांची काढणी उन्हाची तीव्रता कमी असताना सकाळी १० वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी तसेच काढणी चालू असताना काढणी झालेले आंबे लगेच झाडाच्या सावली मध्ये ठेवावीत.
आंबा फळांचे काढणी पश्चात बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी फळांची काढणी देठासह करावी तसेच काढणी नंतर फळे पोटॅशीअम मेटाबायसल्फाईट ०.०५ टक्के (०.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी) या रसायनांच्या ५० अंश सेल्सिअस उष्णजल द्रावणात १० मिनिटे बुडवून नंतर फळे वाळविण्यासाठी सावलीत ठेवावी. त्यानंतर प्रतवारी करुन फळे पिकविण्यासाठी आढीत घालावीत.
आंबा फळांवरील फळमाशीच्या व्यवस्थापनासाठी बागेमधील गळलेली फळे गोळा करुन नष्ट करावीत आणि विद्यापीठाने शिफारस केलेले रक्षक फळमाशी सापळा प्रती एकरी २ या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे साधारण जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर राहील अशा प्रकारे टांगावा.
आंबा फळांची काढणी पूर्व झालेल्या बागेमध्ये झाडाचा विस्तार नियंत्रित करण्याच्या दृष्टीने तसेच नवीन पालवी लवकर मिळविण्याच्या दृष्टीने झाडाच्या गरजेनुसार आवश्यक छाटणी करावी. झाडावरील बांडगुळे व रोगग्रस्त वाळलेल्या फांद्या काढून बागेत स्वच्छता ठेवावी तसेच गळलेली फळे गोळा करुन नष्ट करावी. मोठ्या फांद्यावरील बांडगुळे काढलेल्या तसेच छाटणी केलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. संपूर्ण झाडावर १ टक्का बोर्डोमिषणाची फवारणी करावी.
पाण्याची उपलब्धता असल्यास आंबा फळांची काढणीनंतर झाडाला खते द्यावीत. सर्वसाधारण दहा वर्षे वयाची झाडे किंवा ज्यांची आकाराने उत्पादन क्षमता ३०० ते ४०० फळे देण्याएवढी असेल, अशा झाडांना प्रत्येकी ५० किलो सेंद्रिय खत यामध्ये ४५ किलो चांगले कुजलेले शेणखत आणि ५ किलो मासळी खत ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश बांगडी पद्धतीने द्यावे. फळांची संख्या व शिफारसीत खतांची मात्रा यांचे गुणोत्तर लक्षात घेवून ही मात्रा झाडाच्या वयानूसार आणि उत्पादन क्षमतेनुसार वाढवून द्यावी.
आंबा फळांची काढणी झाल्यावर घन लागवड ५ बाय ५ मीटर किंवा ६ बाय ४ मीटर असलेल्या आंबा बागांमध्ये नियमित छाटणी करावी. यामध्ये उंची कमी करणे, फांद्या एकमेकांमध्ये गेल्या असल्यास छाटणी करावी आणि वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. घन लागवड असलेल्या बागांमधील कलमांची उंची दोन ओळींच्या अंतराच्या ८० टक्के इतकी ठेवावी.
नविन आंबा लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफ सफाई करुन घ्यावी. १० बाय १० मीटर अंतरावर व घन पद्धतीने लागवडीसाठी ५ बाय ५ मीटर अंतरावर १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खणून ते चांगली माती आणि तीन ते चार घमेली चांगले कुजलेले शेणखत आणि ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरुन तयार ठेवावेत.
स्त्रोत - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.