
शेतकरी ः कृष्णा रामराव माने
गाव ः निकळक ता. बदनापूर जि.जालना
एकूण क्षेत्र ः ९ एकर
मोसंबी लागवड ः १ हेक्टर (झाडे ४७५)
जालना जिल्ह्यातील निकळक (ता. बदनापूर) येथील कृष्णा माने यांची ९ एकर शेती आहे. त्यापैकी १ हेक्टरवर त्यांनी २०१५-१६ मध्ये मोसंबी (Sweet Orange) फळबाग लागवड (Orchard Cultivation) केली. उर्वरित क्षेत्रामध्ये कपाशी ५ एकर, सोयाबीन २ एकरांवर लागवड आहे. सुरुवातीची पाच वर्षे बागेतून मोसंबी उत्पादन (Sweet Orange Production) घेतले नाही. या काळात बागेत सोयाबीन, कांदा या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड केली होती. मागील वर्षी पहिले उत्पादन घेतले.
मोसंबी बागेचे संपूर्ण व्यवस्थापन बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रातील डॉ. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. बहर, खत, सिंचनाचे योग्य व्यवस्थापन करून बाजारपेठेचा अंदाज घेत मोसंबी फळांची तोडणी करण्यावर त्यांचा भर असतो.
व्यवस्थापनातील बाबी ः
- एक हेक्टर क्षेत्रामध्ये १५ बाय १५ फूट अंतरावर मोसंबीच्या झाडांची लागवड केली आहे. मोसंबी लागवडीत सुरुवातीची ५ वर्षे झाडांवर कोणताही बहार धरला नाही. जेणेकरून झाडाची निकोप वाढ व्हावी. मागील वर्षीपासून मोसंबी फळांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली.
- बागेतील झाडांवर फक्त आंबिया बहार धरला जातो. त्यानुसार कामांची आखणी करून कार्यवाही केली जाते.
- ताण देण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे, वाळलेल्या, रोगट फांद्या काढून टाकल्या जातात. बाग स्वच्छ केली जाते. बागेतील सर्व काडीकचरा, पडलेली फळे गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावली जाते.
- साधारण नोव्हेंबर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत बागेस ताण दिला जातो.
- ताण तोडतेवेळी सुरुवातीला १ तास ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. त्यापुढील काळात ठिबकचा कालावधी वाढविला जातो. बागेतील जमिनीत पुरेसा ओलावा राहील याची काळजी घेतली जाते.
- तत्पूर्वी मिश्र खतांच्या अर्धा किलो प्रति झाड प्रमाणे मात्रा दिल्या जातात.
- तज्ज्ञांच्या शिफारशीप्रमाणे आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्या जातात.
- छोटा ट्रॅक्टर आणि मजुरांच्या मदतीने बागेतील तण काढले जाते. तणनियंत्रणामुळे पोषक घटकांसाठी तण आणि झाडांची होणारी स्पर्धा कमी होते. त्यामुळे झाडांना पोषक घटकांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो.
- नवती फुटतेवेळी कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी करण्यात येते.
- कीड-रोग व्यवस्थापनासाठी वेळोवेळी बागेचे निरीक्षण केले जाते. आवश्यकतेनुसार योग्य त्या उपाययोजनांचा अवलंब केला जातो.
खत व्यवस्थापन ः
ताण तोडण्यापूर्वी जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान एकदा आणि जून ते जुलै दरम्यान एकवेळ असे दोन वेळा मिश्र खतांच्या मात्रा दिल्या जातात. मे महिन्यात प्रति झाड अडीच ते ३ किलो शेणखताची मात्रा दिली जाते. शेणखत दोन्ही झाडांमधील मोकळ्या जागेत पसरवून त्यानंतर रोटाव्हेटर मारला जातो. त्यानंतर हलके पाणी दिले जाते. मार्च-एप्रिलमध्ये झाडाच्या खोडाला बोर्डो पेस्ट लावली जाते. फळगळ टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या शिफारशीप्रमाणे सिंचन, खत, फवारणीचे व्यवस्थापन केले जाते.
- कृष्णा माने, ८८०६१९१८९२
(शब्दांकन : संतोष मुंढे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.