
अलीकडे बहुतांश शेतकरी ठिबक आणि अन्य सूक्ष्म सिंचन (Micro Irrigation) पद्धतीचा अवलंब करू लागली आहेत. त्याद्वारे पिकांना आवश्यक अन्नद्रव्ये (Nutrients) पुरविण्यासाठी पाण्यात संपूर्ण विरघळणाऱ्या खतांचा (Soluble Fertilizers) वापर केला जातो.
अशा पाण्यात विरघळणाऱ्या अन्नद्रव्यांना विद्राव्य खते म्हणतात. त्यांच्या वापर ठिबक सिंचनासोबत फवारणीद्वारेही (Drip irrigation) करता येतो.
विद्राव्य खते वापरण्याचे फायदे
१) पिकांना जलद गतीने अन्नद्रव्ये मिळतात.
२) अतिपाऊस किंवा पावसाचा मोठा खंड यामध्ये विद्राव्य खतांचा वापर फायद्याचा ठरतो.
३) पिके पानांद्वारे अन्नद्रव्ये शोषून घेतात.
४) खताची नासाडी होत नाही.
५) पीक फूल किंवा फलधारणा अवस्थेत असल्यावर याचा वापर फायदेशीर असतो.
बाजारात उपलब्ध असणाऱ्या विद्राव्य खतांच्या काही ग्रेड्स –
१९:१९:१९, ०:५२:३४, १२:६१:०, ०:०:५०, १३:०:४५, ०:०:५०:१८, १३:४०:१३, २४:२८:० इ.
१९:१९:१९
१) पिकाच्या सुरुवातीच्या काळात वापरण्यास योग्य असते.
२) पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी हे उपयुक्त ठरते.
३) नत्र, स्फुरद आणि पालाश हे घटक सम प्रमाणात असतात.
१२:६१:०
१) याच्या वापराने पिकांच्या मुळांची वाढ होण्यास मदत होते.
२) पिकांमध्ये फुलांची संख्या (फुलधारणा) वाढविण्यासाठी याचा वापर करतात.
०:०:५०
१) फुलोरा अवस्थेनंतर दाणे किंवा फळे उत्पादनाच्या शेवटच्या अवस्थेपर्यंत याचा वापर करावा.
२) यामुळे फळांची गुणवत्ता सुधारते. पिकातील दाणा चांगला पोसतो.
१३:०:४५
१) याला पोटॅशिअम नायट्रेट असेही म्हणतात.
२) यामुळे पिकांना दुष्काळ स्थितीशी लढण्यास बळ मिळते.
०:५२:३४
१) सर्वाधिक लोकप्रिय खत, फुलांचे फळात रूपांतर होण्यास मदत होते.
२) फूल किंवा फळधारणा अवस्थेत वापरावे.
३) अशा अनेक प्रकारची विद्राव्य खते बाजारात उपलब्ध आहेत.
विद्राव्य खते वापरताना कोणती काळजी घ्यावी?
१) खते चांगली विरघळण्यासाठी पाणी स्वच्छ असणे गरजेचे आहे.
२) किलो खते व्यवस्थित विरघळण्यासाठी सरासरी १५ ते २० लिटर पाणी लागते.
३) ठिबक सिंचनाद्वारे खते गेल्यानंतर पुढे १० मिनिटे साधे पाणी जाऊ द्यावे. त्यामुळे लॅटरलमधील खते शेवटच्या रोपांपर्यंत पोहोचवता येतात.
४) दोन खते एकमेकांत मिसळताना त्याची शिफारस आहे का, किंवा ती एकमेकांना पूरक आहेत का, याची माहिती घेतल्यानंतर निर्णय घ्यावा.
५) खते देताना पिकाची अवस्था, वाफसा, वातावरण याचा नीट अभ्यास करणे गरजेचे आहे.
६) ठिबक सिंचनाचा वापर करत असताना फिल्टर, लॅटरल पाइप यांचा दाब योग्य आहे का, याची तपासणी करा.
७) सर्व ड्रीपर्स समान पातळीवर असणे गरजेचे आहे. यामुळे सर्व पिकाला योग्य प्रमाणात खते मिळतात.
८) ठिबक सिंचन संचात कोठेही लिकेज असता कामा नये. अन्यथा खते वाया जातात.
पीक संजीवके
वनस्पतीच्या शारीरिक क्रियांवर ताबा ठेवणारी काही रासायनिक द्रव्ये नैसर्गिकरीत्या वनस्पतींमध्ये तयार होत असतात. या द्रव्यांना संजीवके अथवा वनस्पती वृद्धी संप्रेरके या नावाने ओळखले जाते.
वनस्पतीच्या विविध शरीरक्रियांत वाढ करणे, त्या थांबविणे, त्यांचा वेग मंदावणे किंवा त्यांच्यात बदल घडवून आणणे अशा प्रकारचे अनेक परिणाम या संजीवकांमुळे वनस्पतींमध्ये आढळून येतात.
पिकांच्या वाढीच्या विविध अवस्थेमध्ये वेगवेगळी संजीवके नैसर्गिकरीत्या तयार होत असतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने त्यातील रासायनिक घटक वेगळे करून किंवा प्रयोगशाळेमध्ये कृत्रिमरीत्या ती तयार करणे शक्य झाले आहे.
अशा अनेक संजीवके, संप्रेरके किंवा वाढ रोधके वेगवेगळ्या नावाने उपलब्ध होत आहेत. मात्र ही अत्यंत अल्प आणि शिफारशीप्रमाणे वापरल्यास त्याचा पिकांच्या वाढीसाठी, बहर धरण्यासाठी किंवा वाढ रोखून धरण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यांची ओळख करून घेऊ.
संजीवकाचे प्रकार :
ऑक्झिन्स -
१) यांच्या वापरामुळे वनस्पतीच्या पेशींची लांबी वाढते उदा. आय.ए.ए., आय.बी. ए.
२) कलम करताना भिन्न वनस्पतींच्या पेशींचा एकजीव करण्याचा उद्देश असतो. फळपिके, विविध शोभेच्या झुडपांच्या व फुलझाडांच्या अभिवृद्धीमध्ये ऑक्झिनचा वापर यशस्वीपणे करता येतो.
३) पानांवर व फळांवर ऑक्सिनची फवारणी केल्यामुळे फळांची व पानांची अकाली गळती टाळता येते.
४) द्राक्षाची बियांविरहित प्राप्त करण्यासाठी ऑक्सिनचा वापर केला जातो.
५) वनस्पतीच्या छाट कलमांना मुळे फुटण्यासाठी, तसेच मुळांच्या संख्येत गुणात्मक वाढ करण्याकरिता अंजीर, सफरचंद, अननस, पीच, चहा, गुलाब, बोगनवेलिया, रबर इत्यादी झाडांच्या छाट कलमांना मुळे फुटण्यासाठी केला जातो.
सायटोकायनिन्स
१) या संजीवकांच्या अंगी वनस्पती पेशी विभाजनाची क्षमता आढळते उदा. कायनेटिन.
२) पेशींची वृद्धावस्था टाळण्यामध्ये उपयोगी.
३) बीज अंकुरणासाठी बियांची सुप्तावस्था लवकर संपविणे.
४) प्रकाशसंश्लेषण योग्य प्रकारे करणे इ. सायटोकायनिन्स उपयोगी ठरते.
जिबरेलिन्स
१) या संजीवकांत पेशी विभाजनाची व त्यांची लांबी वाढविण्याची, अथवा या दोन्ही क्रिया करण्याची क्षमता आढळते. उदा. जी.ए.१ ते जी.ए. ५९
२) बियांची सुप्तावस्था मोडण्यासाठी जिबेरलिन्स गटातील संजीवकामध्ये बिया काही काळ भिजविल्यास बियांची उगवण चांगली व लवकर झालेली आढळते.वाढीचा वेग वाढवणे तसेच बियांविरहित फळ प्राप्त करण्यासाठी जिबरेलिन्स उपयोगी आहे.
३) काकडीवर्गीय पिकांमध्ये फळधारणेसाठी स्त्रीलिंगी फुलांपासून फळे मिळतात म्हणून पुल्लिंगी फुलांचे प्रमाण व वाढ कमी करून स्त्रीलिंगी फुलांची संख्या अधिक प्रमाणात व लवकर आणण्यासाठी १०० पीपीएम जिबरेलिक आम्ल वापरतात.
डॉ. रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१, (सहायक प्राध्यापक, मृदा व कृषी रसायनशास्त्र विभाग, सौ. के.एस.के.(काकू) कृषी महाविद्यालय, बीड)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.