Fig Cultivation : अंजीर लागवडीचे नियोजन कसे असावे?

Fig Fruit Crop : अंजीर हे समशितोष्ण कटिबंधातील पानगळ होणारे फळझाड असून, ऊन व थंडी सहजगत्या सहन करते. अंजीर उत्पादनामध्ये २६ टक्के उत्पादनासह तुर्की हा अग्रगण्य देश असून, स्पेन, इटली, ग्रीस, पोर्तुगाल, अल्जिरिया या देशात व्यापारी लागवड होते.
Fig Cultivation
Fig CultivationAgrowon

डॉ. प्रदीप दळवे, डॉ. युवराज बालगुडे, नितीश घोडके

Fig Fruit Crop Management : अंजीर हे समशितोष्ण कटिबंधातील पानगळ होणारे फळझाड असून, ऊन व थंडी सहजगत्या सहन करते. अंजीर उत्पादनामध्ये २६ टक्के उत्पादनासह तुर्की हा अग्रगण्य देश असून, स्पेन, इटली, ग्रीस, पोर्तुगाल, अल्जिरिया या देशात व्यापारी लागवड होते. या व्यतिरिक्त कॅलिफोर्निया, न्यूझीलंड आणि भारतातील काही राज्यांत अंजीर लागवड केली जाते.

महाराष्ट्रात पुणे, छ. संभाजीनगर, उस्मानाबाद, लातूर, नगर, जालना, बीड, सोलापूर, परभणी, सातारा, बुलडाणा, नांदेड, नाशिक, धुळे, सांगली, हिंगोली, वाशीम इ. जिल्ह्यांत अंजिराची लागवड केली जाते. महाराष्ट्रात अंजिरासाठी पुणे जिल्हा अग्रेसर असून, मराठवाड्यातील दौलताबादलगतचा भागही प्रसिद्ध आहे. आपल्याकडे प्राधान्याने ताजी फळे विकली जातात, तर अमेरिका, तुर्की, ग्रीस व स्पेन हे अंजीर सुकवून सुक्या मेव्याच्या स्वरूपात विकले जातात.

महत्त्व ः
अंजिराचा उष्मांक ७५ आणि अन्नमूल्य निर्देशांक ११ म्हणजेच सफरचंदापेक्षाही जास्त आहे. अंजिराच्या फळातून साखर, लोह, चुना, तांबे तसेच अ आणि ब जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते. यात आम्लतेचे प्रमाण नगण्य असल्यामुळे हे फळ गोड लागते. ताजे किंवा सुके अंजीर टॉनिकसारखेच उपयोगी पडते. रक्तातील लोहाची कमतरता भरून काढते. अंजीर हे सौम्य रेचक असून, शक्तिवर्धक, पित्तनाशक व रक्तशुद्धी करणारे आहे.

हवामान ः
अंजिरास कोरडी उष्ण हवा पोषक असून, ओलसर दमट हवामान निश्‍चितपणे घातक ठरते. अति थंडीमुळे फळात साखर तयार होण्याची क्रिया थांबते. हवेतील आर्द्रता वाढल्यास फळाला भेगा पडतात. जोराच्या पावसाच्या सरी पडून गेल्यानंतर गार वारा सुटला तर काही प्रमाणात झाडावर तांबेरा पडतो. ज्या प्रदेशात सरासरी २५ इंच (६२५ मिमी) पाऊस पडतो आणि सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये निश्चितपणे थांबतो, असा प्रदेश अंजीर लागवडीस अनुकूल असतो. फळांची वाढीच्या काळात ३५ ते ३७ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान, पावसाचा अभाव या बाबी आवश्यक. कमी पावसाच्या भागात ऑक्टोबर ते मार्चपर्यंत सिंचनासाठी पाण्याची थोडीफार सोय आवश्यक आहे.

Fig Cultivation
Banana Cultivation : कसे असावे केळी मृग बाग लागवडीचे नियोजन?

जमीन ः
तांबूस रंगाच्या चिकण मातीच्या व पृष्ठभागाखाली ३-४ फुटांवर (०.९ ते १.२ मी.) मुरमाचा थर असलेली जमीन उत्कृष्ट असते. थोड्या प्रमाणात चुनखडी असलेल्या तांबूस, काळ्या मातीतही अंजिराची वाढ चांगली होते. मात्र खूप काळ्या मातीची जमीन या फळझाडासाठी अयोग्य असते. सासवड, दिवे परिसरात हलक्या मगदुराच्या व भरपूर चुना असलेल्या तांबूस काळ्या जमिनीत अंजिराची लागवड केलेली दिसून येते. अंजिराची मुळे साधारणत: ३ फूट (०.९ मीटर) खोल जात असल्यामुळे तेवढ्या खोल व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. अंजिराकरिता मध्यम ओल टिकवून ठेवणाऱ्या निचऱ्याच्या हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा भरपूर पुरवठा केल्यास हे पीक चांगले येऊ शकते.

अंजिराच्या जाती ः पूना अंजीर, दिनकर, एक्सेल, कोनाद्रिया, दिएन्ना, फुले राजेवाडी इ.

रोपांची निवड ः
अंजिराची रोपे शाखीय (फाटे कलम अथवा गुटी कलम) पद्धतीने तयार केली जातात. फाटे कलम पद्धत सोईस्कर, स्वस्त, कमी श्रमाची व जलद पद्धत असल्याने लोकप्रिय आहे. गुटी कलमाच्या साह्याने सुद्धा अंजिराची अभिवृद्धी करता येते. यातील कोणत्याही एका पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवडीसाठी निवड करावी.

Fig Cultivation
Tomato Cultivation : टोमॅटो लागवडीचे नियोजन कसे कराल?

लागवड
उन्हाळ्यात चांगली मशागत केल्यानंतर जमीन नांगरून व ढेकळे फोडून सपाट करून घ्यावी. हलक्या ते मध्यम जमिनीत ४.५ × ३ मी. (हेक्टरी ७४० झाडे) तर भारी जमिनीत ५ × ५ मी. (हेक्टरी
४०० झाडे) अंतरावर१ × १ × १ मी. आकारमानाचे खड्डे खोदून घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात तळाशी पाला-पाचोळ्याचा पातळ थर देऊन १ किलो बोनमील किंवा १.५ किलो सुपर फॉस्फेट, २५ ते ३० किलो कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत व पोयट्याची माती यांच्या मिश्रण भरावे. चांगला पाऊस झाल्यानंतर तयार कलमांची लागवड करावी. लागवडीनंतर झारीने त्वरित हलके पाणी दिल्यानंतर सुरुवातीच्या काळात ३-४ दिवसाआड पाणी द्यावे. कलमांना बांबूचा आधार द्यावा.

कलमांची निगा, वळण आणि आकार
कलमांच्या लागवडीनंतर एक ते दीड महिन्यात नवी पालवी फुटून वाढ सुरू होते. अंजिराची झाडे लहान असताना त्यांच्या बुंध्यामधून जमिनीच्या सपाटीपासूनच धुमारे किंवा फुटवे फुटतात. तीन ते चार सशक्त फुटवे ठेऊन अन्य फुटवे काढून टाकावेत. झाडाचा बुंधा ४ फूट (१.२५ मीटर) उंचीपर्यंत मोकळा ठेवून, त्यानंतर सर्व बाजूंनी पसरतील अशा फांद्या ठेवाव्यात. कलमांची वाढ सुरू झाल्यापासून वळण देण्याचे काम सुरू होते. नको असलेल्या फांद्या नियमितपणे काढाव्यात. अंजिराच्या झाडास खोड किडीची मोठा उपद्रव होतो. एकच खोड ठेवले आणि ते खोडकिड्यांनी पोखरले तर संपूर्ण झाड वाया जाऊ शकते. म्हणून तीन ते चार खोडे राखावीत. त्यातील एखादे खोडकिडीने पोखरले तरी तेवढे खोड जमिनीलगत छाटून झाड वाचविता येते.

Fig Cultivation
Kesar Mango Cultivation : सघन पद्धतीने केसर आंबा लागवडीचे तंत्र कसे आहे?

बहर धरणे
अंजिराला दोन वेळा बहर येतो. पावसाळ्यात येणाऱ्या बहराला खट्टा आणि उन्हाळ्यात येणाऱ्या बहराला मिठा बहर असे म्हणतात. खट्टा बहरातील फळे ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यापर्यंत तयार होतात, परंतु ती आंबट व बेचव असतात. मिठा बहरातील फळे मार्च-एप्रिलमध्ये तयार होतात. या बहरातील फळांचा दर्जा चांगला असल्याने बाजारभाव चांगला मिळतो.

अन्नद्रव्य व्यवस्थापन
लागवडीच्या सुरुवातीच्या काळात नियमित खते द्यावीत. पूर्ण वाढलेल्या झाडाला प्रति वर्ष ५० किलो शेणखत, ११२५ ग्रॅम नत्र (२४४१ ग्रॅम युरिया) ३२५ ग्रॅम स्फुरद (२०३१ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट) व ४१५ ग्रॅम पालाश (६९३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. त्याची विभागणी दोन वेळेमध्ये (५० टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश बहर धरताना व उर्वरित ५० टक्के नत्र बहर धरल्यानंतर एक महिन्याने) करावी. दर्जेदार उत्पादनासाठी बागेचे बहर नियोजन करताना निंबोळी पेंड, जिवाणूसंवर्धक, हिरवळीचे खत, गांडूळ खत, योग्य आच्छादन व पिकांचे अवशेष इ. सेंद्रिय पदार्थांचा वापर महत्त्वाचा आहे. सोबतच अंजीर बागेस कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक, बोरॉन, जस्त, लोह, मॉलिब्डेनम, मँगेनीज, ताम्र इ. सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते. वरील अन्नघटक योग्य प्रमाणात व योग्य वेळी द्यावीत.

पाणी व्यवस्थापन
अंजीर झाडाच्या वाढीबरोबर पाण्याची गरज वाढू लागते. जमिनीच्या मगदुरानुसार भारी जमिनीत ७ ते ८, मध्यम जमिनीत ५ ते ६ आणि हलक्या जमिनीत ३ ते ४ दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे. पाणी देताना बुंध्यापाशी पाणी साचू देऊ नये. यासाठी खोडालगत मातीची भर लावावी. फळ वाढीच्या काळात पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीत जास्त ओलावा टिकून राहिल्यास फळे भेगाळण्याचे प्रमाण वाढते. नियमित सिंचन आणि फर्टिगेशनसाठी ठिबक सिंचन उपयोगी ठरते.

आंतरपिके

साधारणपणे पहिल्या दोन किंवा तीन वर्षांपर्यंत झाडांतील मोकळी जागा आंतरपिके घेण्यासाठी वापरली जाऊ शकते. ताग, बोरू, धैंचा वगैरेसारखी हिरवळीची पिके, अथवा मटकी, मूग, उडीद, सोयाबीन यासारखी द्विदल पिके घ्यावीत. त्याचा जमिनीची प्रत सुधारण्यास फायदा होतो.

फळांची काढणी आणि उत्पादन
अंजिराच्या झाडाला लागवडीच्या दुसऱ्या वर्षापासून तुरळक फळे येऊ लागतात, परंतु फळांचे उत्पादन पहिल्या तीन वर्षांपर्यंत घेऊ नये. सातव्या-आठव्या वर्षापासून उत्पादन वाढत जाते. पुढे २० ते २५ वर्षे बाग नियमितपणे भरपूर फळे देते. अंजिराचे फळ तयार होण्यास सुमारे १२० ते १४० दिवसांचा कालावधी लागतो. फळांचा हंगाम एप्रिल अखेरपर्यंत चालू राहतो. फळांचा हिरवा रंग जाऊन फिक्कट हिरवा अंजिरी, विटकरी, लालसर, जांभळा रंग येऊ लागतो. फळांचा कडकपणा जाऊन फळे मऊ होऊ लागतात. उत्तम व्यवस्थापनातून प्रति झाड सरासरी २५ ते ३० किलो फळे मिळू शकतात.

डॉ. प्रदीप दळवे, (उद्यानविद्यावेत्ता) ८९८३३१०१८५
(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळ पिके (अंजीर आणि सीताफळ) संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com