
शेतकरी ः राधेश्याम खुडे
गाव ः बोरगव्हाण, ता.पाथरी, जि.परभणी.
एकूण क्षेत्र ः २.५ एकर
तुती लागवड ः १.५ एकर
बोरगव्हाण (ता.पाथरी) येथील राधेश्याम खुडे यांची अडीच एकर शेती आहे. अभियांत्रिकी शाखेत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ पुणे येथे खासगी कंपनीत नोकरी केली. परंतु नोकरीत मन रमले नाही. त्यामुळे गावी येऊन शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतली.
घरचे जमीन क्षेत्र कमी असल्यामुळे पारंपारिक पीक (Traditional Crop Method) पद्धतीतून शाश्वत उत्पन्नाची खात्री नव्हती. त्यावेळी गावातील अनेक शेतकरी रेशीमशेती (Silk Farming) करत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी रेशीमशेती करण्याचा निर्णय घेतला. आजवरच्या अनुभवातून विविध प्रयोग करत योग्य व्यवस्थापनातून दर्जेदार रेशीम कोष उत्पादनाचे तंत्र त्यांना गवसले आहे.
व्यवस्थापनातील बाबी ः
- २०१३ मध्ये दीड एकर क्षेत्रावर तुती लागवड करत रेशीमशेतीस सुरुवात केली. तुतीच्या व्ही १ वाणाची ५ बाय ३ बाय २ फूट अंतरावर लागवड केली.
- तुती लागवड शेतीजवळच २६ बाय ६० फूट आकाराच्या रेशीमकीटक संगोपनगृहाची उभारणी केली.
- एका वर्षामध्ये बायव्होल्टाईन जातीच्या २८० ते ३०० अंडीपुंजापासून २५० ते २७० किलो कोष उत्पादन त्यांना मिळते.
प्रत्येक बॅचपासून महिन्याला खात्रीशीर उत्पन्न मिळू लागल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यातूनच तुती क्षेत्रात अडीच एकरापर्यंत विस्तार केला आहे. मागील काही दिवसांत काही कारणास्तव एक एकर क्षेत्रावरील तुती मोडून टाकली आहे. सध्या फक्त दीड एकर क्षेत्रावर तुती लागवड आहे.
- मागील दोन वर्षांपूर्वी आणखी एका संगोपनगृहाची (२२ बाय ६६ फूट) उभारणी केली आहे. सध्या त्यांच्याकडे एकूण दोन संगोपनगृह आहेत. त्यामुळे सलग बॅच घेणे शक्य होते. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
- थंडी, उष्ण वारे या पासून संरक्षण करण्यासाठी निवाऱ्याभोवती गोणपाट (तागाचे पोते) लावले आहेत. त्यामुळे रेशीम कीटक संगोपनासाठी आवश्यक असलेले २२ ते २५ अंश सेल्सिअस तापमान राखणे शक्य होत असल्याचे राधेश्याम सांगतात.
मागील कामकाज ः
- तुती लागवडीमध्ये डीएपी ५० किलो, पोटॅश ५० किलो, युरिया २५ किलो प्रतिएकर प्रमाणे खत मात्रा दिली.
- पावसामुळे तुती बागेत जास्त प्रमाणात पाणी साचून होते. त्यामुळे झाडांची वाढ खुंटली गेला. त्यामुळे पाने देखील अपेक्षित प्रमाणात वाढली नाहीत. त्यामुळे पुढील बॅच १७५ अंडीपुंजाची घेण्याचे नियोजन आहे. कारण, बॅच सुरु झाल्यानंतर रेशीमकीटकांना पुरेसा पाला उपलब्ध होणे आवश्यक आहे.
- मागील बॅच गेल्यानंतर संगोपनगृहाची स्वच्छता करून घेतली. त्यानंतर संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण केले.
- त्यानंतर रविवार (ता.२ ऑक्टोबर) ला १७५ अंडीपुंजाची बॅचपासून कोष उत्पादनास सुरुवात केली.
आगामी नियोजन ः
- सध्या मस्कराडईन रोगाच्या प्रादुर्भावासाठी पोषक वातावरण आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रेशीम अळी पांढऱ्या रंगाची होऊन खडूप्रमाणे दिसते. आणि कडक होते. या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी चुना, ब्लिचिंग पावडर, बुरशीनाशक पावडरचा वापर केला जाईल.
- वातावरण दमट असून ऑक्टोबर हीटमुळे संगोपनगृहातील तापमान वाढण्याची शक्यता आहे. तापमान योग्य राखण्यासाठी दुपारच्या वेळी २ ते ३ तास संगोपनगृहाच्या बाजूने लावलेल्या पोत्यांवर लॅटरलद्वारे पाणी सोडले जाईल. त्यामुळे संगोपनगृहातील तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस राखले जाईल.
विक्री नियोजन ः - सुरुवातीला बेंगलोर जवळील रामनगरम येथील रेशीम मार्केटमध्ये कोषाची विक्री केली जायची. मात्र, लॉकडाऊनमध्ये रेल्वे बंद असल्यामुळे पूर्णा (जि. परभणी) येथील बाजारपेठेत कोष विक्री करावी लागली. तेथून पुढे आता पूर्णा मार्केटमध्येच संपूर्ण कोषाची विक्री केली जाते.
- मागील बॅचपासून ३०० अंडीपूंजांपासून ३ क्विंटल २४ किलो कोष उत्पादन मिळाले. एका किलोमध्ये साधारण ४६० कोष होते. पूर्णा मार्केटमध्ये प्रतिकिलो कोषास ४९० रुपये दर मिळाला.
- राधेश्याम खुडे, ८८८८९३१७९३
(शब्दांकन ः माणिक रासवे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.