

लातूर येथे १९७६ मध्ये स्थापन झालेल्या आदर्श महिला गृह उद्योग या स्वयंसेवी संस्थेच्या प्रथमपासून संस्थापक, कार्यकारिणी सदस्या आणि १९८५ पासून अध्यक्ष असलेल्या चंद्रकला नंदकिशोर भार्गव ४५ वर्षांहून अधिक काळापासून सामाजिक कार्याचा वसा जपत आहेत.
१९८३ ते १९९९ दरम्यान त्या ‘नारी प्रबोधन मंच’ या संस्थेच्या त्या अध्यक्षा होत्या. महिलांचे सामाजिक, कायदेशीर, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण, महिलांवरील अत्याचारांचे निर्मूलन, शाश्वत ग्रामीण विकास यासह आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या योग्य उपायांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे.
किशोरवयीन मुलांसाठी मार्गदर्शन आदी विषयांमध्ये त्यांचे कार्य विस्तारलेले आहे. या क्षेत्रातील विस्तृत संशोधन, पुस्तक लेखन, लेख, दोन हजारांहून अधिक व्याख्याने, विविध सेमिनार आणि सादरीकरणांमध्ये त्यांचा सहभाग आहे. उल्लेखनीय कार्यासाठी युनिसेफ, अनेक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांनी त्यांना पुरस्कार देवून गौरविले आहे.
संस्थेचे विविध उपक्रम
-सुमारे दोन लाख स्त्रिया, पुरुष, मुली आणि मुले यांच्यापर्यंत पोहोचत विविध कार्यक्रमांद्वारे शिक्षित करण्याचे कार्य.
- विविध गावांमध्ये शेतीविषयक प्रशिक्षणाचे आयोजन. या प्रशिक्षणामध्ये महिलांचा मोठा सहभाग.
- लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पर्यावरण संवर्धन उपक्रमामध्ये ५२,००० हून अधिक रोपांची लागवड. औषधी वनस्पतींबाबत जनजागृती.
- पीडित महिलांसाठी कौटुंबिक समुपदेशन केंद्राची स्थापना.
- उदगीर तालुक्यातील २५ गावांमध्ये दुष्काळ निवारण व सहाय्यता कार्यक्रम.
- दुष्काळाच्या काळात उदगीर तालुक्यातील विधवा, गरजू महिला शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली होती.
- लातूर तालुक्यातील २० गावांमध्ये स्वयंसहाय्यता गटांद्वारे हुंडा थांबवण्यासाठी विशेष मोहीम.
- ७,८०० ग्रामीण कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी ६५० हून अधिक बचत गटांचे जाळे.
- ज्योती म्हापसेकर लिखित ‘मुलगी झाली हो’ नाटकाचे १५० हून अधिक प्रयोगांचे दिग्दर्शन आणि सादरीकरण. भारत आणि अमेरिकेमध्ये या नाटकाचे ४९ एकपात्री प्रयोग.
- किशोरवयीन मुला -मुलींसाठी ‘जिज्ञासा-जीवन शिक्षण’ उपक्रमाचे आयोजन.
महिलांना व्यावसायिक मार्गदर्शन
‘आदर्श महिला गृह उद्योग’ संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रामधून सुमारे १२,९७७ हून अधिक महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या गृह उद्योग सुरू केला आहे.
प्रशिक्षणामध्ये इको-फ्रेंडली ज्यूट पिशव्या निर्मिती, पर्स, चामड्याच्या पिशव्या, पेंटिंग, मशिन आणि हॅंड एम्ब्रॉयडरी, रिबन वर्क, पॅचवर्क, साबण, सॉस आणि जॅम निर्मितीचे प्रशिक्षण आयोजित केले जाते. याचबरोबरीने ग्रामीण भागामध्ये गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, धूप कांडी निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते.
‘बायो व्हिलेज' उपक्रम
संस्थेतर्फे लातूर जिल्ह्यातील १५२ गावांमध्ये सेंद्रिय शेती, जल शुद्धीकरण, पाणी व्यवस्थापन, गांडूळ खत इत्यादींबाबत जनजागृती करण्यासाठी ‘युनिसेफ’च्या सहकार्याने ‘बायो-व्हिलेज’ हा कार्यक्रम राबविण्यात आला. संस्थेने निवासी क्षेत्र, शाळांसाठी ‘कचऱ्यातून नंदनवन’ हा जैव-कचरा व्यवस्थापन कार्यक्रम राबविला.
महिलांच्या स्वयंसाह्यता गटांच्या माध्यमातून ८,५०० परसबागांची उभारणी केली आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी, शोषखड्डे आणि ग्रामीण भागात झाडे वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येतो.
संपर्क : चंद्रकला भार्गव, ९४२२०१३८५५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.