
भारतातून आज शेती सोडणारे कितीतरी तरुण भरकटत फिरत आहेत. त्यांना माझं एकच सांगणं आहे, चला तरुणांनो शेतीकडे आणि ग्रामीण भारताकडे फिरूया. आज आपला देश ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करत आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर महात्मा गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’ असा संदेश दिला. परंतु खरंच आज तरुण ग्रामीण भागाकडं वळतोय का? आज खेड्यात सुद्धा वीज, पाणी, रस्ते आणि दूरसंचार आदी सोयीसुविधा २४ तास आणि शहराच्या बरोबरीने मिळत आहेत. तरी देखील गावातील युवकांचा लोंढा शहराकडे वळत आहे. त्यामुळे शहरांची लोकवस्ती फुगत चालली आहे. तडजोड करून मिळेल ते काम करायचे. मिळेल त्या जागी राहायचे आणि आयुष्याची गुजराण करायची चाललीय.
आज रोजी भारताची लोकसंख्या १३९ कोटींच्या घरात जातेय. आणखी काही वर्षांत ही लोकसंख्या (२०३० पर्यत) १४० ते १५० कोटींच्या घरात जाईल मग आता एवढ्या वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज वाढणार आहे. त्यासाठी शेतीतून मिळणाऱ्या अन्नधान्याला दुसरा पर्याय नाही. देशासमोर आता अन्नसुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अशावेळी पिकाऊ जमीन काय वाढणार नाही. उलट ती औद्योगिकीकरण, रस्ते आणि बांधकाम आदी कारणांनी कमी मात्र नक्की व्हायला लागलीय.
अशावेळी वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची भूक भागविण्यासाठी आहे त्या क्षेत्रातूनच उत्पादन वाढविणे अनिवार्य आहे. त्या शिवाय आता दुसरा पर्याय नाही. भविष्यात अन्नप्रक्रिया आणि अन्य पदार्थ पॅकिंग आणि सेवा क्षेत्रांत खूप मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील. आणि हे सर्व जिथं पिकतंय तिथंच होईल. त्यामुळे जे आता शेतीत आहेत, त्यांनी पाय रोवून तिथंच थांबून नवीन आव्हानांना, संधी समजून जोमाने काम करायचे आहे.
आपल्याला शेतीतील यांत्रिकीकरणासाठी मर्यादा आहेत, त्यामुळे मनुष्य बळ हे मोठ्या प्रमाणात लागणारचं आहे. कमी क्षेत्रात जास्त प्रमाणात उत्पादन घेऊन त्यावर जागेवर प्रक्रिया करण्यासाठी बेरोजगार युवकांना फार मोठी संधी आहे. मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग आपली वाट पाहतोय, त्याची आवड-निवड पाहून गुणवत्ता पूर्वक उत्पादने आपल्याला घ्यावी लागतील. पीक उत्पादन, प्रक्रिया, पॅकिंग, ग्रेडिंग आणि मार्केटिंग यातील तरुणांच्या सहभागामुळे खेड्याचं अर्थकारणचं बदलून जाईल. कित्येक तरुणांना - बेरोजगारांना उद्योग व्यवसाय मिळेल.
बेरोजगारी संपली तर पर्यायाने तरुणांमधील व्यसनाधीनता आपोआपच संपून जाईल. कित्येक तरुणांना रोजगार, व्यवसाय उद्योग मिळतील. याचबरोबर गावातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तरामध्ये वाढ होईल. आर्थिक सुबत्ता आल्याने खेडी सुजलाम, सुफलाम होतील. एक नवं खेडं आत्मनिर्भरतेच्या दिशेने पाऊल टाकेल.. म्हणून म्हणतोय गड्यांनो... ‘या तरुणांनो, परत फिरा रे!’
कृषिपंडित सुरेश पाटील (आयसीएआर राष्ट्रीय पुरस्कार विजेते), बुदीहाळ, ता. निप्पाणी, जि. बेळगाव
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.