
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय ३० जुलै रोजी काढण्यात आला आहे. या योजनेनुसार गरीब महिलांना वर्षभरात मोफत ३ गॅस सिलेंडरचं पुनर्भरण करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना या योजनेअंतर्गत वर्षाला मोफत ३ गॅस सिलेंडर देण्याचा उल्लेख शासन निर्णयात केला आहे. त्यासाठी अटीशर्थी घालण्यात आल्या आहेत.
२०१६ पासून केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवतं. गरीब कुटुंबातील महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणं आणि महिलांना धूरमुक्त करणं असा या योजनेचा उद्देश असल्याचा दावा सरकारकडून केला जातो. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील ५२ लाख १६ हजार कुटूंबांना लाभ मिळतो. आता मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांसोबतच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांना वर्षभरात मोफत ३ गॅस सिलेंडरचा लाभ दिला जाणार आहे.
पात्रता काय ?
- ज्या महिलांच्या नावावर गॅसची जोडणी आहे, म्हणजे कनेक्शन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाही या योजनेसाठी पात्र आहेत.
- मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत पात्र असलेल्या लाभार्थी महिलाही पात्र आहेत.
- एका कुटुंबात एकच लाभार्थी पात्र असणार आहे. तेही रेशन कार्डनुसार. म्हणजे एका कुटुंबात दोन महिला असतील, जसं की आईच्या आणि पत्नीच्या नावावर प्रत्येकी एक गॅस कनेक्शन असेल तर मात्र दोघीपैकी एकच जण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरणार आहे.
- ज्या महिलांकडे १४.२ किलो ग्रॅमच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन आहे, अशा महिलांनाच हा लाभ देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार गॅस सिलेंडरवर अनुदान देतं. म्हणजे गॅस सिलेंडर खरेदी करताना त्याची किंमत ग्राहकांला द्यावी लागते. नंतर केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून ३०० रुपये अनुदान थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करतं. तर आता केंद्र सरकारचं अनुदान आणि राज्य सरकार प्रति सिलेंडर अंदाजे ५३० रुपये थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करणार आहे. म्हणजेच प्रति सिलेंडर ८३० रुपये लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.
गॅस सिलेंडर खरेदी करताना मात्र खरेदी किंमत आधी द्यावी लागणार आहे. आणि मग सरकार तीन गॅस सिलेंडरची रक्कम बँक खात्यात जमा करणार आहे. त्यासोबतच एका महिन्यात एकच सिलेंडरचं अनुदान लाभार्थीना मिळणार आहे. म्हणजे दोन सिलेंडर घेतले तर मात्र त्यातील एकाच सिलेंडरसाठी अनुदान राज्य सरकार देणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ १ जुलै २०२४ पासून मिळणार आहे. पण १ जुलै २०२४ च्या नंतर रेशन कार्ड जर विभक्त केलं असेल तर मात्र सदर कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाही, असंही शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कधीपर्यंत सुरू ठेवली जाणार आहे ? याबद्दलची शासन निर्णयात माहिती देण्यात आलेली नाही. दुसरं म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत माझी लाडकी बहीण योजनेतील किती महिला पात्र ठरतील, याची माहिती लाडकी बहीण योजनेची यादी आल्यास समोर येईल.
खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला झटका बसल्यामुळं आता विधानसभेची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन राज्य सरकारनं लाभार्थी योजनांची खेळी सुरू केली आहे. त्यामध्ये महिला मतदारांवर राज्य सरकारनं विशेष लक्षकेंद्रीत केल्याचं दिसतं. परंतु योजनेच्या अटीशर्थीमुळे अनेकांना लाभापासून वंचित राहावं लागत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.