
Nashik News: ‘‘शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र प्रत्यक्ष कार्यवाही नाही. हे घोषणा सरकार विसरलेले दिसते. इतर प्रकल्पांवर खर्चासाठी सरकारकडे पैसा आहे. मग शेतकऱ्यांसाठी खर्च करायला काय अडचण आहे,’’ असा सवाल माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.
हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाच्या औचित्याने जयहिंद लोकचळवळ यांच्या वतीने शनिवारी (ता. ५) नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहात महाराष्ट्रातील कर्तृत्ववान युवा शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी ‘राज्यस्तरीय युवा शेतकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार डॉ. शोभा बच्छाव, जयहिंद लोकचळवळीचे अध्यक्ष डॉ.सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, आमदार मनोज कायंदे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. अशोक ढगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे श्री. थोरात म्हणाले, की अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता आली आहे. शेती उत्पादनात वाढ झाली, त्यातून समृद्धी आल्याचे दिसते. मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढ होण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी वेळच्या वेळी मदत आणि कर्जमाफी केलीच पाहिजे. मात्र या सरकारची केवळ घोषणा करायच्या, मात्र द्यायचे काहीच नाही, ही सरकारची पद्धत योग्य नाही.
ते पुढे म्हणाले, की कृषी विद्यापीठांमध्ये ७० टक्के मनुष्यबळ कमी आहे. अवघ्या ३० टक्के मनुष्यबळावर कारभार सुरू आहे. एकीकडे अनुदान नाही तर दुसरीकडे शास्त्रज्ञ नाही. त्यामुळे कृषी विकास कसा साधणार? शेतीमध्ये समृद्धी दिसते. मात्र आत्महत्या थांबल्या नाहीत. हा आकडा दररोज वाढतो आहे.
त्यामुळे शेती व शेतकऱ्यांना आर्थिक ताकद द्यावी लागेल. ६ हजार रुपयांच्या मदतीचा उल्लेख ऐकला जाणार नाही. तसेच सरकारला ठणकावून सांगत कामे करून घेण्याची परंपरा होती. मात्र अलीकडे लोकप्रतिनिधी सभागृहात बोलायला तयार नाही. सत्ताधारी घटकांबरोबर गोडगोड कारभार सुरू आहे. आता लोकप्रतिनिधी जबाबदाऱ्या विसरले आहेत. तसेच कृषी पुरस्कार जाहीर होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीसाठी, तर सुधाकरराव नाईक यांनी जलक्रांतीसाठी योगदान दिले त्यामुळे गेले सात दशके नाईक कुटुंब राजकारणात असल्याचा आवर्जून उल्लेख मंत्री नाईक यांनी केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. संतोष चव्हाण यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. सुधीर तांबे यांनी केले. यावेळी सत्यजित तांबे, खासदार डॉ. बच्छाव यांची मनोगते झाली.
आदिनाथ चव्हाण यांचा सन्मान
‘‘ॲग्रोवन’ हे शेतकऱ्यांच्या हक्काचे वर्तमानपत्र असल्याचे कै. मुख्यमंत्री विलासराव देशमुख आवर्जून सांगायचे. प्रसिद्ध मजकुराचे अनेक ठिकाणी संदर्भही ते द्यायचे,’’ अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी ‘ॲग्रोवन’चे दिलखुलास कौतुक केले. तर कृषी पत्रकारितेतील योगदानाबद्दल ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक डॉ. आदिनाथ चव्हाण यांचा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
...यांचा झाला सन्मान
मिथिलेश नाईक (फणस शेती, रत्नागिरी), शुभम कोरडे (कृषिपूरक व्यवसाय, अकोला), जगदीश शेंडगे (खजूर व मोसंबी उत्पादन, जालना), वसंतराव पाटील (केळी उत्पादन, जळगाव), शिवानी आजबे (ड्रॅगन फळ उत्पादन व पुरवठा साखळी, सोलापूर), समीर डोंबे (अंजीर शेती, पुणे) वर्षा मरकड ( दूध उत्पादन, गांडुळ खत निर्मिती, अहिल्यानगर), अभय पवार (ड्रॅगन फळ उत्पादन, धुळे), बापू मोरे (फलोत्पादन, नाशिक), गोवर्धन जाधव (सेंद्रिय शेती, नाशिक), अनंत मोरे (द्राक्ष शेती, पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक), योगेश पाटील (कृषी संघटन, नाशिक)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.