Latur News : तालुक्यात मध्यंतरी पडलेल्या सततच्या जोरदार पावसानंतर आता विविध पिकात तणाला पोषक वातावरण निर्माण झाले. खरिपातील विविध पिकात तण वाढत आहे. परिणामी,तणाला नष्ट कसे करावे या चिंतेत शेतकरी असल्याचे चित्र आहेत. त्यातच तणाचे बी पडून पुढील वर्षी पुन्हा जास्त त्रासदायक ठरण्याची शक्यता असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
खरिप हंगामात सुरवातीला जेमतेम पावसावर पेरणीसाठी महागडे बियाणे, रासायनिक खतांची शेतकऱ्यांनी खरेदी केली. त्यानंतर विविध पिकांचा कोळपणी, खुरपणी, फवारणीसह तणनाशक फवारण्या केल्या.
गेल्या पंधरा दिवसात मात्र सततच्या जोरदार पावसाने झोडपल्यामुळे विविध पिकात पाणी साचले. त्यामुळे पावसानंतर तणाला पोषक स्थिती निर्माण झाली. खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन पिके काढणीच्यावेळी विविध प्रकारच्या तणांनी अनेक ठिकाणी थैमान घातले आहे.
पावसाने पाला हिरवा राहिल्याने अगोदर पाने वाळण्यासाठी व तण जाण्यासाठी तणनाशक फवारणी करून उडिदाची रास करावी लागल्याचे शेतकरी सांगत आहेत. सोयाबीनमध्येही तण वाढल्याने अनेक ठिकाणी हाच प्रयोग शेतकऱ्यांना करावा लागणार असल्याचे चित्र आहे.
पिकात वाढलेले हे तण उत्पादनावर विपरीत परिणाम करण्याची भीती असते. पिकाच्या काढणीत अडथळा तर येतोच शिवाय याबरोबरच पुढील हंगामात पुन्हा तणाचे बियाणे पडून तण वाढण्याची शक्यता असते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.