Water Storage : सांगली जिल्ह्यातील पस्तीस प्रकल्पात पाणीसाठा ‘फुल्ल’

Water Stock : ऑगस्टमध्ये सर्वदूर पाऊस झाल्याने सप्टेंबर महिन्यात ९ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
Dam Water Storage
Dam Water StorageAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात ५ मध्यम व ७८ लघू प्रकल्प असे एकूण ८३ प्रकल्पांत ५१ टक्के पाणीसाठा झाला होता. ऑगस्टमध्ये सर्वदूर पाऊस झाल्याने सप्टेंबर महिन्यात ९ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ८३ प्रकल्पांपैकी ३५ प्रकल्पांत शंभर टक्के पाणीसाठा झाला असून, जत तालुक्यात २६ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे मध्यम व लघू प्रकल्पातील पाणीसाठा वाढला आहे. ऑगस्ट महिन्यात ८३ प्रकल्पांत ३९५८ दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा झाला होता. ऑगस्ट महिन्याच्या पंधरवड्यात पावसाने उघडीप दिली.

Dam Water Storage
Water Storage : दोन दिवसांच्या पावसाने २० प्रकल्प तुडुंब

त्यानंतर मध्यापासून पुन्हा पाऊस झाला. त्यामुळे या पावसामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत झाली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ९४४० दशलक्ष घनफूट इतकी आहे. सप्टेंबरमध्ये ८३ प्रकल्पांत ५९०५.७७ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला असून, त्यापैकी ४६६४.१२ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील ८३ प्रकल्पापैकी ३५ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तासगाव तालुक्यातील सर्वाधिक प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. कडेगाव, शिराळा आणि जत या तीन तालुक्यांत अनुक्रमे पाच प्रकल्प पाण्याने फुल्ल झाले आहेत. यंदा सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पातील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे एका महिन्यात ९ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे.

Dam Water Storage
Water Storage : जालना जिल्ह्यात ४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा

प्रामुख्याने दुष्काळी पट्ट्यातील तासगाव, खानापूर, आटपाडी जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे या तालुक्यातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने दोन ते तीन महिने पाणीटंचाई भासणार नाही. मात्र जत तालुक्यात २७ प्रकल्पांपैकी ५ प्रकल्पांत शंभर टक्के पाणीसाठा झाला असला तरी, २७ प्रकल्पांत २६ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे काही अंशी जत तालुक्यात पाणीटंचाई उद्‍भवण्याची शक्यता आहे.

गतवर्षीच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी पाणीसाठा अधिक

गतवर्षी पावसाने दडी मारली होती. ऐन पावसाळ्यात प्रकल्पात पाणीसाठा कमी झाला होता. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात १८५३.९० दशलक्ष घनफूट म्हणजे २४ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबर महिन्यात ४६६४.१२ दशलक्ष घनफूट म्हणजे ६० टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३६ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला असल्याचे पाटबंधारे विभागाने दिलेल्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com