Well Water Theft: साक्षाळपिंपरीत शेतकऱ्याच्या विहिरीतील पाणी चोरीला
Beed News: पाण्याच्या टंचाईने होरपळणाऱ्या बीड तालुक्यातील साक्षाळपिंपरी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकरी त्र्यंबक काशीद यांच्या शेतातील विहिरीत आंब्याची झाडे व गुरांसाठी राखून ठेवलेले पाणी चोरट्यांनी शुक्रवारी (ता. २५) रात्री ६ टँकर भरून चोरले.
याप्रकरणी काशीद यांचा मुलगा हरी काशीद याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत व्यथा मांडली आहे. साक्षाळपिंपरी हे पौंडूळ धरणाखालील सुमारे अडीच हजार लोकसंख्येचे गाव असून गावाला २२ दिवसांआड नळाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. अशा टंचाईच्या काळात त्र्यंबक काशीद यांनी आपल्या विहिरीत आंब्याची ३५ झाडे आणि गुरांसाठी पाणी साठवून ठेवले होते.
सध्या विहिरीत अवघे अडीच परस पाणी शिल्लक होते. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी वीजपंपाच्या स्टार्टर पेटीचे कुलूप तोडले आणि पंप सुरू करून पाण्याची चोरी केली. ६ टँकरमध्ये पाणी भरून नेले, तर एक टँकर पाणी शेतातच सोडून दिल्याने पाण्याची नासाडी झाली.
‘‘विहिरीतील पाणी चोरी करण्यासारखी बाब नव्हती. कुणी विचारले असते, तर मी आनंदाने पाणी दिले असते,’’ अशी खंत हरी काशीद याने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केली. तसेच गावापासून दूर शेतात विहीर असलेल्या शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहनही त्याने केले आहे.
दरम्यान, विहिरीतील पाणी चोरीच्या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अशा घटनांना गांभीर्याने घ्यावे, अशी मागणी होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.