Yavatmal News : जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने प्रकल्पांत मुबलक जलसाठा आहे, असे असतानाही काही भागात पाणीटंचाईची शक्यता आहे. यासाठी तीन कोटी रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यात विहीर अधिग्रहण, टँकर यांसह विविध ४०२ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत आहे. असे असतानाही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. गेल्या वर्षी ५२८ गावांत टंचाईच्या दृष्टीने विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या.
यासाठी सात कोटी ८० लाख ३३ हजार रुपयांच्या संभाव्य टंचाई कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती. टंचाई आरखड्यातून विंधन विहीर कार्यक्रम, तात्पुरती पूरक नळयोजना, नळ योजनांची विशेष दुरूस्ती, विंधन विहीर विशेष दुरुस्ती, खासगी विहीर अधिग्रहण, टँकर आदी उपाययोजना करण्यात आल्या.
यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाला. सर्वत्र ओला दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. असे असतानाही जिल्ह्यातील साडेतीनशे गावात यंदाही पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संभाव्य टंचाईच्या कृती आराखड्यावर शिक्कामोर्तब केले आहे. जवळपास तीन कोटी रुपयांचा पाणीटंचाईचा संभाव्य कृती आराखडा आहे.
यंदा २९ टँकर प्रस्तावित
जिल्ह्यात यंदा जवळपास साडेतीनशे गावात पाणीटंचाईची शक्यता आहे. यासाठी तब्बल दोन कोटी ९९ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. साडेतीनशे खासगी विहीर अधीग्रहणासह २९ टँकरने पाणीपुरवठा प्रस्तावित आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत सात, एप्रिल ते जून या कालावधी २२ टँकर लागण्याची शक्यता आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.