Pune News : राज्यातील महायुती सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला गुरूवारी (ता. २७) सुरूवात होणार आहे. मात्र याआधी महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची पूर्ण तयारी केली आहे. सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी (ता. २६) सांगितले. ते महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी वडेट्टीवार यांनी, राज्य सरकारसह महायुतीवर सडकून टीका केली. राज्यासह केंद्रातील मोदी सरकार विश्वासघातकी असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.
या बैठकीला काँग्रेस विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते सतेज पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, राष्ट्रवादी (शरद पवार) अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उद्धव ठाकरे) अंबादास दानवे, शेकाप जयंत पाटील, सपा अबू आझमी उपस्थित आहेत.
यावेळी वडेट्टीवार म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची वल्गना केली होती. मात्र ती जुमलेबाजीच ठरली. सरकारने कोणत्याही शेती उत्पादनास दीडपट हमीभाव दिला नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला २०२४ मध्ये २०१३ चे भाव दिले जात आहेत. सध्या सोयाबीनला ४६०० रूपये दर मिळत असल्याने शेतकऱ्याला फसवण्याचे महापाप महायुती सरकारने केले.
राज्यासह देशातील शेतकऱ्यांची मागणी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे सी२ वर आधारीत हमीभाव द्यावा अशी होती. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तरी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मोदींना शेतकऱ्याच्या व्यथा सांगतील अशी अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास घात केला अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
मुख्यमंत्री कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीला गेले होते. त्यावेळी शिंदे राज्यातील कापूस आणि सोयाबीनचा मुद्दा उचलतील असे अपेक्षीत होते. त्याप्रमाणे त्यांनी प्रश्न मांडला. तर सोयाबीनला ५१०० हमीभाव द्यावा अशी मागणी केली. पण पदरात पडले तरी काय? हमीभावात फक्त ७ ते ८ टक्केच वाढ झाली. कापूस ७ टक्के, तूर ८ टक्के, ज्वारी ६ आणि मक्यात ६.५ टक्के वाढ करण्यात आली. तर बियाणांच्या किमतीत ३५ ते ३८ टक्के वाढ करण्यात आली. खतांच्या किंमतीही जीएसटीमुळे ३५ टक्के वाढ झाली. तर मोदी सरकारने शेती अवजारांवर देखील १८ टक्के जीएसटी लादल्याचे आल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
महायुती सरकार शेकऱ्यांचे नसून बियाणे, खते आणि शेती अवजारांवर जीएसटी लावत सुटले आहे. पण हेलिकॉप्टर, हिरे, सोन्याची खरेदी वर जेमतेम जीएसटी लावत आहे. त्यामुळे आता सरकारने सर्वसामान्यांचे मरण ही महाग केलंय का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थिती केला. याआधी युरिया पिशवी ५० रुपयाला मिळायची. आता पिशवी १५० रूयांवर गेली आहे. तर ५० किलोची युरिया पिशवीच्या वजनात घट करून ४० किलोवर आणली. याचाच अर्थ या सरकारला राज्यातला शेतकरी जगवायचा नाही. त्याला उद्ध्वस्त करायच आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
जनतेने सरकारची हवा काढली
मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चहापानाचं निमंत्रण दिले आहे. मात्र सरकारने राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम केलं. नको ती युती राज्यातील जनतेला पहावी लागत आहे. पण पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं सरकारच्या छातीतील हवा काढली. त्याबद्दल जनतेचे आभार मानत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.