Nagar News : ‘‘देशाचा विकास घडवून आणायचा असेल तर महिलांचा विकास महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार राज्यातील महिला अर्थशास्त्राच्या केंद्रस्थानी याव्यात यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. महिला सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे. विरोधकांनी कितीही विरोध केला तरीही महिलांसाठी आणलेल्या योजना पुढील पाच वर्षे अविरत सुरू राहतील,’’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शिर्डी येथे शुक्रवारी (ता. २७) मुख्यमंत्री महिला सबलीकरण अभियान कार्यक्रम झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह नगर जिल्ह्यातील आमदार, खासदार, माजी पदाधिकारी व अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतातील संकल्पना मांडली असून भारताची गरिबी दूर करायची असेल, भारताला विकासाकडे न्यायचे असेल तर महिला अर्थशास्त्राच्या केंद्रस्थानी असाव्यात. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने महिलांचे विकासासाठी योजना आणल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांना एसटीमध्ये ५० टक्के प्रवास सवलत, राज्यातील मुलींना ५६० विविध कोर्सेसाठी मोफत शिक्षण, महिलांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत दिले. गॅस, शौचालय, लखपती दीदी या योजनेतून महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले. राज्यातील अकरा लाख महिला वर्षाला लाखो रुपये कमवतात,’’ असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
‘सावत्र भावापासून सावध राहा’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर या वेळी निशाणा साधला ते म्हणाले, की महिलांच्या विकासासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर सावत्र भावांच्या पोटात दुखू लागले आहे. काँग्रेसच्या नेत्याने योजना बंद कराव्यात यासाठी कोर्टात याचिका केली आहे. परंतु काहीही झाले तरी महिलांसाठींच्या योजना आम्ही बंद करणार नाही, असेही ते म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.