Alibaug News : अलिबाग तालुक्यातील ४७ गावे आणि ३३ वाड्या या रामराज परिसरातील उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सध्या हे धरण गाळाने भरले असल्याने धरणातील गाळ काढण्याबरोबरच धरणाच्या दुरुस्तीसाठी दीड वर्षापूर्वी २१५ कोटींचा प्रस्ताव दिल्याची माहिती देण्यात आली;
मात्र त्यानंतर अद्याप धरणाचे काम झालेले नाही. त्यामुळे उमटे धरणाची कामे व २१५ कोटींच्या प्रस्तावाची स्थिती याबाबत सामाजिक कार्यकर्ते अॅड. राकेश पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेकडे तक्रार अर्ज केला आहे.
अलिबाग तालुक्यातील ४७ गावे व ३३ वाड्यांतील लोकांना पिण्याच्या पाण्याचे एकमेव साधन असलेले हे धरण सध्या सरकारी व राजकीय उदासीनतेमुळे गाळाने भरले आहे. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या जनता दरबारामध्ये उमटे धरणाच्या बाबतीत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
या प्रश्नाच्या बाबतीत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने पत्र दिले होते. या पत्रामध्ये उमटे धरणाचे सविस्तर सर्वेक्षण करून धरणाची पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १४ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मंत्री यांच्या बैठकीत घेण्यात आला होता.
२१५ कोटींचा प्रस्ताव रखडला
एमजेपीने नेमणूक केलेल्या तांत्रिक सल्लागारामार्फत अंदाजे २१५ कोटी रकमेचा एकत्रित प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यापैकी पाईपलाईनच्या कामासाठी तांत्रिक मंजुरी प्राप्त असूनही कामास मंजुरी देणे बाकी आहे. अशा प्रकारचे पत्र आपल्याला देण्यात आले आहे, असे अॅड. राकेश पाटील यांनी म्हटले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.